हायलाइट्स:
- उत्तराखंड विधानसभा निवडणूक २०२२ च्या तोंडावर
- भाजपला मोठा धक्का
- आर्य पिता-पुत्र भाजपची साथ सोडत स्वगृही परतले
काँग्रेसचं सदस्यत्व घेत दोन्ही नेत्यांनी घरवापसी केलीय. या कार्यक्रमाला काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला, अखिल भारतीय काँग्रेस समितीचे संघटना सरचिटणीस के सी वेणुगोपाळ, प्रदेश प्रभारी देवेंद्र यादव तसंच उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत हेदेखील उपस्थित होते.
यशपाल आर्या अहो बाजपूर मतदारसंघाचे तर त्यांचा मुलगा संजीव आर्य नैनीताल मतदारसंघाचे आमदार आहेत. पुष्कर सिंह धामी सरकारमध्ये यशपाल आर्य मंत्रीपदावर होते. त्यांच्याकडे परिवहन, समाज कल्याण, अल्पसंख्यांक कल्याण, विद्यार्थी कल्याण, निवड आणि उत्पादन शुल्क विभाग अशा सहा विभागांची जबाबदारी होती.
आजचा दिवस माझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. राहुल गांधी यांच्या प्रयत्नांमुळे मी पुन्हा एकदा माझ्या कुटुंबात सहभागी होत आहे. माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात काँग्रेसमध्ये झाली होती. तब्बल ४० वर्ष मी काँग्रेसमध्येच काम केलं. काँग्रेसमध्ये मला नेहमीच मोठी जबाबदारी मिळाली. काँग्रेसला उत्तराखंडात यश मिळण्यासाठी प्रयत्न करणं हाच यापुढे माझा कर्म आणि धर्म असेल, असं यावेळी यशपाल आर्य यांनी म्हटलंय.
मुख्यमंत्री धामी यांची प्रतिक्रिया
तर, यशपाल आर्य यांच्या काँग्रेस प्रवेशावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांची नाराजी स्पष्टपणे व्यक्त झाली. भाजपमध्ये देश पहिल्या आणि पक्ष दुसऱ्या स्थानावर आहे. वैयक्तिक हित हे अखेरचं असतं. यशपाल आर्य यांचं वैयक्तिक हित समोर आल्यानं त्यांनी काँग्रेसचा मार्ग धरल्याचं धामी यांनी खोचकपणे म्हटलंय.
२०१७ साली काँग्रेस सोडून यशपाल आणि संजीव आर्य यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर भाजप सरकारमध्ये यशपाल आर्य यांना कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times