हायलाइट्स:
- ‘राज्यात महिला अत्याचाराची लाट’
- ‘अत्याचाऱ्यांना पोलीस आणि सरकारची भीती नाही’
- चित्रा वाघ ठाकरे सरकारविरोधात आक्रमक
‘महाविकास आघाडीचं हे सरकार लोकधार्जिणे नसून, त्यांच्या आमदार, खासदार आणि बगल बच्च्यांसाठी हे सरकार आहे. राज्यात करोनाची तिसरी लाट येईल की नाही, हे माहिती नाही, पण राज्यात महिला अत्याचाराची लाट येत आहे. अत्याचाऱ्यांना पोलीस आणि सरकारची भीती नाही. राज्यात कोणालाच कायद्याचा धाक नाही. संजय राठोड सारख्या बलात्काऱ्याला आणि सरकारमधील भ्रष्टाचारी सहकाऱ्यांना वाचवण्याचं पाप महाविकास आघाडी सरकार करत आहे,’ असा घणाघात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे.
विठू माऊली सोशल फाऊंडेशन आणि भारतीय जनता पार्टी मावळ आयोजित लाठी-काठी प्रशिक्षण शिबिराच्या समारोप समारंभ प्रसंगी चित्रा वाघ बोलत होत्या.
यावेळी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, ‘उत्तर प्रदेशामध्ये शेतकऱ्यांना चिरडण्यात आलं, म्हणून संपूर्ण महाराष्ट्र बंद ठेवत आहात. मग ज्या मावळात आपण बसलोय त्याच मावळमधील शेतकरी आपल्या हक्काच्या पाण्यासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना त्यावेळी तीन शेतकऱ्यांना गोळ्या घालून ठार केले. त्यावेळेस महाराष्ट्र बंद का नाही केला? आमच्या संवेदना त्या उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांसोबत आहे. ज्यांनी कुणी हे केलं असेल, त्यांना शिक्षा होणार. आपला राज्यासाठी वेगळा न्याय व दुसऱ्या राज्यासाठी वेगळा न्याय असं का? त्याही वेळी का महाराष्ट्र बंद केला नाही, मात्र प्रत्येक गोष्टीत राजकारण करून राजकीय पोळी भाजून आपल्यावर भ्रष्टाचाराच्या चौकशीचे सुरू असलेल्या विषयाचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीचा हा केविलवाणा खटाटोप या महाभकास आघाडी सरकारचा आहे,’ असा टोला चित्रा वाघ यांनी राज्यातील आघाडी सरकारला लगावला.
माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंचाही सरकारवर निशाणा
शेतकऱ्यांच्या हितासाठी देशात विविध योजना आणणारे नरेंद्र मोदी हे या देशाच्या पहिलेच पंतप्रधान आहे. मात्र शेतकऱ्यांचे हित काहींना पाहावत नाही. दलालांचा पुळका असणारे व दलालांच्या हितात आपले हित पहाणारे मोदी आणि केंद्र सरकार हे कसे शेतकरी विरोधी आहे, असा अपप्रचार करत आहेत. हे लोक शेतकऱ्यांना भडकावून घाणेरडं राजकारण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत, असा हल्लाबोल बाळा भेगडे यांनी केला आहे.
दरम्यान, या कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, माजी सभापती गुलाब म्हाळस्कर, शांताराम कदम, माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, जिल्हा परिषद सदस्या अलका धानिवले, नितिन मराठे, विठु माऊली सोशल फाऊंडेशन संस्थापक किरण राक्षे, एकनाथ टिळे, बाळासाहेब घोटकुले, पांडुरंग ठाकर, सरचिटणीस सुनिल चव्हाण, महिला आघाडी अध्यक्षा सायली बोत्रे, सभापती ज्योती शिंदे, युवा मोर्चा अध्यक्षा संदिप काकडे, उपसभापती दत्तात्रय शेवाळे, माजी सभापती निकीता घोटकुले, सुवर्णा कुंभार, देवा गायकवाड, बाळासाहेब जाधव, महागाव चांदखेड गण अध्यक्ष ज्ञानेश्वर आडकर, महागाव गण अध्यक्ष नारायण बोडके, संघटनमंत्री गणेश ठाकर, सरपंच सीमा ठाकर यांच्यासह महिला भगिनी उपस्थित होत्या.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times