हायलाइट्स:
- महाराष्ट्र बंदच्या मुद्द्यावरून भाजपची महाविकास आघाडीवर टीका
- रोहित पवारांनी केला पलटवार
- बंद यशस्वी झाल्याचा केला दावा
उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ राज्यातील महाविकास आघाडीने आज महाराष्ट्र बंद पुकारला आहे. त्याला राज्यातून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. भाजपकडून मात्र या बंदला विरोध आहे. राज्यातील भाजपच्या नेत्यांनी बंद फसल्याचा दावा केला आहे. तंच अनेक नेत्यांनी बंदमागे महाविकास आघाडीचे राजकारण असल्याचाही आरोप केला आहे.
या आरोपांना आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करून उत्तर दिलं आहे. त्यांनी म्हटलं आहे, ‘आपल्या न्याय्यहक्कांसाठी आंदोलन करणाऱ्या अन्नदात्यावर अन्याय होत असेल तर त्याविरोधात आवाज उठवायला नको? म्हणूनच आजचा हा बंद आहे. यामुळे कोणत्याही पक्षाला त्रास होण्याचं कारण नाही. काहींना हा बंद राजकीय वाटत आहे. पण ज्यांना ही राजकीय भूमिका वाटत असेल त्यांनी आत्मचिंतन करावं. राज्यात व्यापारी, कामगार आणि इतर सर्व घटकांकडून शेतकऱ्यांच्या हिताच्या जपणुकीसाठी या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. हे पाहून सकाळपासूनच भाजपच्या नेत्यांना सलगपणे पत्रकार परिषदा घेऊन बंद अयशस्वी झाल्याचं पुन्हा पुन्हा सांगावं लागत आहे, यातच हा बंद यशस्वी झाल्याचं स्पष्ट होतं.’
‘शेतकऱ्यांबाबत तुम्हाला तळमळ नसेल, पण…’
‘शेतकऱ्यांबाबत तुम्हाला तळमळ नसेल पण या बंदला पाठिंबा दिलेल्या घटकांशी बोलून त्यांना याबाबत विचारू शकता. पण बंदला मिळालेलं यश पाहून उगीच आदळआपट करण्यात काहीही अर्थ नाही. बोलायचंच असेल तर लखीमपूरचा ‘तो’ व्हिडिओ बघून तुम्हाला वेदना झाल्या की काहीच वाटलं नाही, हे तरी एकदा कळू द्या,’ असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times