प्रकरण काय?
या संदर्भात बीडी२४ या वृत्तविषयक वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, ढाक्यापासून सुमारे १०० किलोमीटरवर असणाऱ्या कमिला येथे दंगलींना सुरुवात झाली. कथित ईशनिंदा झाल्याच्या आरोपावरून या दंगली सुरू झाल्या. दंगली सुरू होताच प्रशासन आणि पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. चांदपूर जिल्ह्यातील हाजीगंज, छट्टोग्राम जिल्ह्यातील बन्शखली आणि कॉक्स बझार जिल्ह्यातील पेकुआ या ठिकाणी हिंदू मंदिरांवर हल्ले करण्यात आले.
सध्या अनेक ठिकाणी दुर्गापूजेनिमित्त मंडप उभारले आहेत. एका ठिकाणी परिस्थिती हाताबाहेर गेली आणि दंगली सुरू झाल्या, असे ‘ढाका ट्रिब्यून’ने म्हटले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या पोलिसांवरही दंगलखोरांनी हल्ला चढवला, असेही वृत्तात म्हटले आहे.
घटनेचे पडसाद
कमिला येथील घटनेननंतर हाजीगंज तालुक्यात बुधवारी जमाव आणि पोलिसांमध्ये संघर्ष होऊन त्यात तीन जण मारले गेले, असे ‘डेली स्टार’च्या वृत्तात म्हटले आहे. त्यानंतर बांगलादेश पोलिसांच्या रॅपिड अॅक्शन बटालियनचे गुन्हे विरोधी आणि दहशतवादविरोधी पथक आणि बॉर्डर गार्ड बांगलादेश या निमलष्करी दलाचे कर्मचारी दंगली रोखण्यासाठी तैनात करण्यात आले, असेही ‘डेली स्टार’ने म्हटले आहे.
धार्मिक व्यवहार मंत्रालयाने तातडीने निवेदन प्रसिद्ध करून लोकांना शांतता राखण्याचे आणि कायदा हातात न घेण्याचे आवाहन केले. जातीय सलोखा आणि सौहार्द कायम राखावे, असेही आवाहन या निवेदनात करण्यात आले. बांगलादेशात हिंदूचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या (१६.४७ कोटी) सुमारे दहा टक्के आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times