२०२०मध्ये १०७ देशांच्या यादीमध्ये भारत ९४व्या स्थानावर होता, तर आता ११६ देशांच्या यादीमध्ये १०१व्या स्थानी घसरला आहे. २०००मध्ये भारताचा भूक निर्देशांक ३८.८ होता, तर २०१२ ते २०२१ या काळात तो २८.८ ते २७.५च्या दरम्यान आहे.
कुपोषित, बालकुपोषण (उंचीनुसार आवश्यक वजनाचा निकष), कुपोषित बालके (वयानुसार आवश्यक वजनाचा निकष), बालमृत्यू यांचा यामध्ये प्रामुख्याने विचार होतो. उंचीनुसार आवश्यक वजनाचा निकषातील कुपोषित बालकांचे प्रमाण १९९८ ते २०२० या कालावधीत १७.१ होते. तर २०१६ ते २०२० या कालावधीत ते १७.३ झाले आहे. भारतात करोनासाथीच्या काळात नागरिकांना मोठा फटका बसला. अर्थगाडी अडली. स्थलांतरितांची काळजी वाढली. त्याचा परिणामही दिसून आला. जगाच्या तुलनेत उंचीनुसार आवश्यक वजनाचा निकषातील कुपोषित बालकांचे प्रमाण भारतात सर्वाधिक आहे. मात्र, बालमृत्यू, कुपोषणाच्या इतर निकषांमध्ये भारताची स्थिती सुधारत असल्याचे दिसले.
पाकिस्तान, बांगलादेश पुढे
शेजारी देशांचा विचार केला तर नेपाळ ७६, बांगलादेश ७६, म्यानमार ७१, पाकिस्तान ९२व्या स्थानी आहे. या देशांमध्येही चिंता आहेच; पण भारताच्या तुलनेत त्यांनी बरी स्थिती नोंदवली आहे. जागतिक हवामान बदल, आर्थिक आणि आरोग्याच्या दृष्टीने असलेली आव्हाने यांचा परिणाम अन्नसुरक्षा आणि पोषणावर होत असल्याचे दिसते. तसेच देश, प्रांत, जिल्हे, समाजातील असमतोलाचा परिणामही दिसून आला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times