हायलाइट्स:
- आरोग्य विभागाच्या परीक्षेतील गोंधळ
- रोहित पवारांनी केल्या ‘या’ मागण्या
- त्यावरून सोशल मीडियातूनही रोष व्यक्त
आरोग्य विभागातील ५२ प्रकारच्या पदांसाठी परीक्षा होत आहे. एकूण ८ लाख परीक्षार्थी ही परीक्षा देत आहेत. परीक्षा घेण्याचे काम एका खासगी कंपनीकडे सोपविण्यात आले आहे. गेल्यावेळी गोंधळ झाल्याने आदल्या दिवशी ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार २४ ऑक्टोबरला परीक्षा होत आहे. त्यासाठीची प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना मिळण्यास सुरवात झाली. त्यातून पुन्हा एकदा गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. या परीक्षेचे दोन सत्रात आयोजन करण्यात आले आहे. मात्र, गोंधळामुळे उमेदवारांना सकाळी एका जिल्ह्यात आणि दुपारी दुसऱ्या जिल्ह्यात केंद्र देण्यात आली आहेत. उमेदवारांनी निवडलेली केंद्र न देता दूरचे केंद्र देण्यात आल्याच्याही तक्रारी आहेत. त्यावरून सोशल मीडियातूनही रोष व्यक्त केला जात आहे.
याची दखल घेत रोहित पवार यांनी म्हटले आहे, ‘एकाच दिवशी दोन परीक्षांसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात परीक्षा केंद्र आल्याने अनेकांना एका परीक्षेला मुकावं लागणार आहे. शासनाने परीक्षा घेणाऱ्या कंपनीला संबंधित अडचण सोडवण्याचे निर्देश तत्काळ द्यावेत आणि मदत केंद्र सुरू करून परीक्षार्थ्यांच्या सोयीनुसार परीक्षा केंद्र पुन्हा ठरवून द्यावीत. तसंच कोणत्याही परिस्थितीत ही परीक्षा पुढं ढकलू नये. वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी फी न घेता प्रत्येक परिक्षार्थ्याकडून एकाच पदाची फी घ्यावी.
शिवाय पहिल्या वेळी परीक्षा रद्द झाल्याने आता सर्व परीक्षार्थींना परीक्षेला जाण्यासाठी एसटीचा प्रवास मोफत करायला हवा. उमेदवार मोठ्या कष्टाने अभ्यास करतात आणि आई-वडील पदरमोड करुन मोठ्या आशेने मुलांचा खर्च करतात, पण परीक्षा घेणाऱ्या कंपन्या त्यांच्या भविष्याशी खेळतात, हे योग्य नाही. म्हणून कृपया येत्या काळात सर्व परीक्षा राज्य लोकसेवा आयोगामार्फतच घेण्यात याव्यात,’ अशी विनंती पवार यांनी सरकारली केली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times