हायलाइट्स:

  • शरद पवार यांचा एकेरी उल्लेख
  • भाजपविरोधात आक्रमक झाले रोहित पवार
  • देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांवर साधला निशाणा

अहमदनगर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगलीतील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला. यावरून महाविकास आघाडीतील नेत्यांकडून प्रत्युत्तर दिलं जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (राष्ट्रवादी रोहित पवार) यांनीही चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची नावे न घेता त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

‘हे सत्ता जाण्याचं दुःख आहे आणि ते समजू शकतो, परंतु या पातळीपर्यंत दुःख होईल ही अपेक्षा नव्हती. किती काळ सत्तेत राहिलात यापेक्षा सत्तेत असताना लोकांसाठी काय केलं हे महत्त्वाचं असतं,’ अशा शब्दांत रोहित पवार यांनी भाजपच्या नेत्यांना उत्तर दिलं आहे.

किरीट सोमय्या यांचे पवार कुटुंबावर गंभीर आरोप; सुप्रिया सुळे म्हणाल्या…

रोहित पवार यांनी सोशल मीडियात पोस्ट लिहून भाजपच्या नेत्यांना उत्तर दिलं आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, ‘अपेक्षाभंग झाला की दुःख होणं साहजिकच असतं आणि ते दुःख, ती सल कायम मनाला हतबल करते आणि ही हतबलता सहन न झाल्यास काहीजण मग तोल ढळल्यासारखं बडबडतात. असंच भाजपच्या नेत्यांचं झालं आहे. ५० वर्षांहून अधिक काळ संसदीय राजकारणात काम करणाऱ्या शरद पवार यांचा भाजपचे काही स्वयंघोषित वरिष्ठ नेते एकेरी उल्लेख करू लागले यात त्यांची चूक नाही, तर हे सत्ता जाण्याचं दुःख आहे आणि ते समजू शकतो, परंतु या पातळीपर्यंत दुःख होईल ही अपेक्षा नव्हती,’ असा टोला रोहित पवार यांनी लगावला.

देवेंद्र फडणवीससनवारी हल्लाबोल

‘स्व. प्रमोद महाजन, स्व. गोपीनाथ मुंडे, स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह लालकृष्ण अडवाणी यांनी हयातभर विरोधी पक्षात राजकारण केलं, मात्र त्यांचा तोल कधी ढळला नाही. महाराष्ट्रात मात्र काहींना सत्तेचा दुरावा सहन होत नसल्यामुळे असं होत असावं. मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे विरोधी पक्ष नेत्यांनी काढलेले अर्थ, पत्रकार परिषदेत त्यांची देहबोली आणि गमावलेला आत्मविश्वास सर्व काही सांगून जात होता. भारतीय जनता पक्षाने बंगालमध्ये साम-दाम-दंड-भेद हे सर्वकाही वापरून बघितलं, परंतु बंगाली अस्मितेसमोर ते टिकाव धरू शकले नाहीत, बंगालच्या जनतेने भाजपला घरचा रस्ता दाखवला. महाराष्ट्रातही भाजपकडून असेच सगळे मार्ग वापरून बघितले जात आहेत. याच संदर्भाने मुख्यमंत्री साहेब बोलले. आपल्याच चुकीमुळे आपल्या राज्याच्या हक्काचे जीएसटीचे पैसे बुडत असताना, मुंबईचं आर्थिक महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला जात असताना, महाराष्ट्राचं पाणी गुजरातला पळवलं जात असताना आजवर केवळ बघ्याची भूमिका घेण्यात आली. अशा नेत्यांना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या मराठी अस्मितेच्या संदर्भाचा अर्थ तरी कसा कळेल?’ असा खोचक सवालही रोहित पवार यांनी विचारला आहे.

‘…तरंच तुम्हाला शांतता लाभेल’

‘किती काळ सत्तेत राहिलात यापेक्षा सत्तेत असताना लोकांसाठी काय केलं हे महत्त्वाचं असतं. आपला पक्ष टिकवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार पडून आपण सत्तेत येण्याची स्वप्न दाखवली जातात, पण आता भाजपमधलीच मंडळी या ‘पुन्हा येण्याला’ कंटाळली आहेत. तसंच ‘सरकार पडणार की नाही यातून बाहेर पडा’ हा काही दिवसांपूर्वी तुमच्याच पक्षाच्या नेत्यांनी दिलेला सल्ला जरुर विचारात घ्या आणि चांगल्या भावनेने लोकांसाठी, राज्याच्या हितासाठी काम करा, असं केलं तर तुम्हाला नक्कीच शांतता लाभेल’, असा सल्लाही रोहित पवार यांनी दिला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here