हायलाइट्स:
- संयुक्त किसान मोर्चाकडून देशभरात रेल रोकोचं आवाहन
- कृषी कायदे, लखीमपूर हिंसाचाराच्या घटनेचा निषेध
- केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या राजीनाम्याची मागणी
लखीमपूर खीरीमध्ये घडलेली हिंसक घटना विस्मरणात जाऊ शकत नाही. आरोपींविरोधात कारवाई न झाल्यानं आज शेतकऱ्यांनी सहा तासांचा रेल्वे बंद पुकारला आहे. यात वेगवेगळ्या जिल्ह्यातील शेतकरी सहभागी होतील, असं ट्विट किसान एकता मोर्चानं केलंय.
दरम्यान, रेल रोकोच्या पार्श्वभूमीवर लखनऊ जिल्ह्यात कलम १४४ ची घोषणा पोलिसांनी केलीय. रेल रोकोमध्ये सहभागी होणाऱ्यांविरोधात पोलीस कारवाई करतील. तसंच कुणीही सामान्य परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्याविरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये (NSA) कारवाई करण्यात येईल, असंही लखनऊ पोलिसांनी म्हटलंय.
शेतकऱ्यांचा रेल रोको
तीन कृषी कायद्यांच्या विरोधार्थ सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलना दरम्यान घडलेल्या लखीमपूर हिंसाचार प्रकरणानं या आंदोलनाला मोठा धक्का बसला. या हिंसाचाराच्या विरोधार्थ तसंच केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी करत संयुक्त किसान मोर्चाकडून आज (सोमवारी) रेल रोको घोषित करण्यात आला आहे. अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा हा लखीमपूर हिंसाचारातील मुख्य आरोपी आहे.
लखीमपूर हिंसाचाराच्या घटनेत न्याय सुनिश्चित करण्यासाठी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातून अजय मिश्रा तेनी यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी संयुक्त किसान मोर्चाकडून करण्यात आलीय.
शेतकरी आंदोलनाच्या आडून काही असामाजिक तत्त्वांकडून कारवायांच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केलीय. शांति-व्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस अधिकारी शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून माहिती घेणार आहेत.
शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून सुरक्षा वाढविण्यात आली असली तरी अद्याप कोणतीही रेल्वे रद्द करण्याची घोषणा करण्यात आलेली नाही.
रेल्वे रोको अतिशय शांतिपूर्ण पद्धतीने केला जाईल. या दरम्यान सार्वजनिक मालमत्तेला कोणत्याही प्रकारे हानी पोहचविली जाणार नाही, असं आश्वासन किसान मोर्चाकडून देण्यात आलंय.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times