हायलाइट्स:
- मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा दावा
- ऑगस्ट २०१८ ते ऑक्टोबर २०१९ पर्यंत मलिक जम्मू-काश्मीरचे राज्यपाल
- मलिक यांच्या कार्यकाळातच काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवण्यात आला होता
मी जेव्हा जम्मू काश्मीरचं राज्यपाल पद सांभाळत होतो तेव्हा कोणताही दहशतवादी श्रीनगरच्या ५०-१०० किलोमीटर क्षेत्रात प्रवेशही करू शकत नव्हता. आता मात्र असं नाही. आता श्रीनगरमध्ये दहशतवादी गरीब नागरिकांना ठार मारत आहेत, हे दु:खद आहे, असं सत्यपाल मलिक यांनी म्हटलंय.
सत्यपाल मलिक हे ऑगस्ट २०१८ ते ऑक्टोबर २०१९ पर्यंत जम्मू काश्मीरच्या राज्यपालपदी होते. त्यांच्या कार्यकाळातच ऑगस्ट २०१९ मध्ये जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद ३७० हटवण्यात आला होता. तसंच या भागाला दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेशात विभाजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
त्यानंतर मलिक यांनी नोव्हेंबर २०१९ ते १८ ऑगस्ट २०२० पर्यंत गोव्याच्या राज्यपाल पदाचा कारभार हाताळला. २० ऑगस्ट २०२० रोजी यांनी मेघालयाचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली.
गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये सामान्य नागरिकांना दहशतवाद्यांनी निशाण्यावर घेतल्याचं दिसून येतंय. बाहेरील राज्यांतून मोल-मजुरीसाठी केंद्रशासित प्रदेशात दाखल झालेल्या नागरिकांच्या हत्या करण्यात आल्यानंतर परिसरात दहशतीचं वातावरण आहे. रविवारी कुलगामच्या वानपोह भागात दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात दोन प्रवासी मजुरांचा मृत्यू झाला. यापूर्वी शुक्रवारी बिहारच्या एका पाणीपुरी विक्रेत्याला दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार केलं. तर उत्तर प्रदेशातील आणखी एका नागरिकाची दहशतवाद्यांकडून हत्या करण्यात आली होती.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times