हायलाइट्स:
- राज्य सरकारची आपत्कालीन बैठक
- मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी घेतला तयारीचा आढावा
- मुख्यमंत्री वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्याशी सतत संपर्कात
एसडीआरएफकडून २२ प्रवाशांची सुटका
राज्यात अनेक ठिकाणी प्रवासी अडकून पडल्याचं समोर येतंय. एसडीआरएफ, उत्तराखंड पोलीस जानकी चट्टी इथून काही प्रवाशांची सुटका करत रात्री उशिरा त्यांना सुरक्षितरित्या गौरीकुंडला पोहचवलं. हे प्रवासी केदारनाथ मंदिरातील दर्शनानंतर अडकून पडले होते. पावसाच्या जोरामुळे भूस्खलन आणि जमीन खचण्याचा धोका निर्माण झाला होता. यामुळे, गौरीकुंड – केदारनाथ पायी मार्गावर मंदाकिनी नदीच्या दुसऱ्या बाजुला अडकून पडलेल्या जखमी प्रवाशांसहीत बाहेर काढण्यात आलं. एसडीआरएफनं तब्बल २२ प्रवाशांना सुखरुपरित्या सुरक्षित स्थळी पोहचवल्याचं प्रशासनाकडून माहिती देण्यात आली.
गाड्या पाण्याच्या प्रवाहात अडकल्या
चमोली – बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गाच्या लामबगड नाल्यात एक गाडी फसल्याचं आढळून आलं. सीमा रस्ते संघटनेनं (BRO) जेसीबीच्या मदतीनं या गाडीला ओढून पाण्याबाहेर काढलं. गाडीतील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचं समजतंय. सध्या या मार्गावर वाहतूक बंद करण्यात आलीय.
ऋषिकेशमध्ये प्रवासी वाहनांना चंद्रभागा पूल, तपोवन, लक्ष्मण झुला आणि मुनी-की रेती भद्रकाली बॅरियर न ओलांडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
प्रशासनाची तयारी
मुख्यमंत्री धामी यांनीही सचिवालय स्थित आपत्ती नियंत्रण कक्षातून राज्यात झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला आहे. तसंच मुख्यमंत्री वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्याशी सतत संपर्कात आहेत. सोमवारी राज्य सरकारची एका आपत्कालीन बैठकही पार पडली. यामध्ये तयारीचा आढावा घेण्यात आला.
खबरदारीचा उपाय म्हणून उत्तराखंडात शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्यात आले आहे. राज्यात पर्यटनासाठी दाखल झालेल्या नागरिकांना दिशानिर्देश जारी करण्यात आले आहे. अनावश्यक प्रवास टाळून घरीच राहण्याचा सल्ला नागरिकांना देण्यात आला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times