हायलाइट्स:
- मंत्रिमंडळ फेरबदलात डच्चू मिळाल्यानंतर नाराज
- तडकाफडकी भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय
- ‘तृणमूल’मध्ये दाखल झाल्यानंतर सोपवला खासदारकीचा राजीनामा
राजीनामा दिल्यानंतर मीडियाशी बोलताना आपल्या राजकीय प्रवासाबद्दल बोलताना सुप्रियो भावूक झालेले दिसले.
माझ्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात भाजपमधून झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्ष प्रमुख जे पी नड्डा आणि अमित शहा यांचे आभार मानतो. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. मी मनापासून राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला होता. मी पक्षाचा एक भाग नसेल तर खासदारकी आपल्याकडे ठेवू नये, असं मला वाटलं. त्यामुळे आज राजीनामा सोपवल्याचं बाबुल सुप्रियो यांनी म्हटलंय.
बाबुल सुप्रियो यांनी २०१४ आणि २०१९ अशा दोन वेळा आसनसोल लोकसभा मतदार संघातून विजय मिळवला होता. नरेंद्र मोदी सरकारमध्ये त्यांना केंद्रीय राज्यमंत्रीपदही मिळालं. परंतु, यंदा पार पडलेल्या मंत्रिमंडळ फेरबदलात त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला होता. यानंतर त्यांनी तडकाफडकी राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला होता.
ऑगस्ट महिन्यात भाजपमधून बाहेर पडताना सुप्रियो यांनी पर्यावरण, वन आणि पर्यावरण बदल राज्य मंत्रीपदाचा राजीनामा सोपवला होता. यावेळी, आपण यापुढे कुठल्याही राजकीय पक्षात सहभागी होणार नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मात्र, १८ सप्टेंबर रोजी त्यांनी अधिकृतरित्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times