हायलाइट्स:
- २४ ऑक्टोबर रोजी भारत पाकिस्तान दरम्यान टी २० मॅच
- असदुद्दीन ओवैसी यांचा मोदी सरकारवर निशाणा
- ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन गोष्टींबद्दल कधीही बोलत नाहीत’
जम्मू काश्मीरच्या पुँछ भागात दहशतवाद्यांनी भारतीय सेनेवर केलेल्या हल्ल्यातील शहिदांबद्दल बोलताना असदुद्दीन ओवैसी यांनी चीड व्यक्त केली. सोबतच, भारत आणि पाकिस्तान दरम्यान होणाऱ्या टी 20 मॅचलाही त्यांनी विरोध व्यक्त केला आहे. ‘काश्मीरमध्ये आमचे नऊ जवान शहीद झाले आहेत आणि भारत २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानसोबत टी २० मॅच खेळणार आहे’, असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधलाय.
पाकिस्तान दररोज काश्मीरमध्ये भारतीयांसोबत २० – २० खेळतंय, असं म्हणत खोऱ्यात जवळपास प्रत्येक दिवशी गैर-काश्मीरी नागरिकांच्या हत्येचा मुद्दा ओवैसी यांनी उचलून धरला. केंद्र शासित प्रदेशात या हत्या रोखण्यात भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार नाकाम ठरल्याचं त्यांनी म्हटलंय.
बिहारचे गरीब प्रवासी मजूर मारले जात आहेत, टार्गेट किलिंग होत आहे. तपास यंत्रणा आणि गृह मंत्री अमित शहा काय करत आहेत? असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला. गेल्या काही दिवसांत पुलवामा आणि श्रीनगर भागात दहशतवाद्यांकडून जवळपास १० सामान्य नागरिकांची हत्या घडवून आणण्यात आलीय.
‘मोदी दोन गोष्टींबद्दल कधीही बोलत नाहीत’
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन गोष्टींवर कधीही बोलत नाहीत. एक म्हणजे, पेट्रोल – डिझेलची दरवाढ आणि दुसरं लडाख सीममेवर भारताच्या सीमेत घुसखोरी करणारी चिनी सेना, असं म्हणत ओवैसी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केलीय.
उल्लेखनीय म्हणजे, देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींनी उच्चांक गाठला आहे. रविवारी तेल कंपन्यांनी सलग चौथ्या दिवशी इंधनांच्या किंमतीत वाढ केली. दिल्लीत पेट्रोल १०५.८५ रुपये प्रती लीटर तर डिझेल ९४.५७ रुपये प्रती लीटरपर्यंत पोहचलंय.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times