हायलाइट्स:
- राज्य सरकारने केलेली मदत तुटपुंजी असल्याचा व्यापाऱ्यांचा आरोप
- सरकारविरोधात भाजपने केलं आंदोलन
- वाढीव मदत देण्याची व्यापाऱ्यांची मागणी
‘भीक नको, मदत द्या’ असा आक्रोश सांगलीतील व्यापाऱ्यांकडून करण्यात आला. जुलै महिन्यात आलेल्या महापुराने सांगली शहरातील बहुतांश बाजारपेठ पाण्याखाली गेली होती. कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाल्याने व्यापारी उद्ध्वस्त झाले. करोनाच्या संकटामुळे आधीच व्यापाऱ्यांचे अर्थकारण कोलमडून पडलं आहे. त्यातच महापुराचा फटका बसल्याने व्यापारी हवालदिल झाले होते.
व्यापाऱ्यांना सावरण्यासाठी राज्य सरकारने प्रत्येकी ५० हजार रुपये किंवा एकूण नुकसानीच्या ७५ टक्के मदत देण्याचे जाहीर केले होते. जिल्हा प्रशासनाकडून सध्या मदतीचे धनादेश व्यापाऱ्यांना मिळू लागले आहेत. लाखो रुपयांचे नुकसान होऊनही केवळ दोनशे ते पंधराशे रुपयांचे धनादेश मिळत असल्याने व्यापारी संतप्त झाले आहेत.
राज्य सरकारकडून पूरग्रस्त व्यापाऱ्यांना मिळालेल्या तुटपुंज्या मदतीविरोधात भाजप आक्रमक झाली असून सांगलीत भाजपच्या नेत्यांनी व्यापाऱ्यांना सोबत घेऊन मंगळवारी राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने केली. भीक नको, पूरग्रस्तांना हक्काची मदत द्या, अशी मागणी यावेळी भाजपच्या स्थानिक नेत्यांसह व्यापाऱ्यांनी केली. २०१९ च्या महापुरानंतर तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने केलेल्या मदतीनुसार सध्याच्या सरकारने मदत करावी, अशी मागणी व्यापार्यांनी केली आहे. तसंच मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनंतरही मदत मिळू शकली नाही, याबाबत खंत व्यक्त करण्यात आली. यावेळी भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times