हायलाइट्स:

  • ‘सरकारमुळे शेतकऱ्यांवर शिमगा करण्याची वेळ’
  • ‘आघाडीच्या नेत्यांची दिवाळी गोड होवू देऊ नका’
  • राजू शेट्टी यांनी घेतली आक्रमक भूमिका

कोल्हापूर : ‘यंदाच्या दसऱ्याला सरकारमुळे शेतकऱ्यांवर शिमगा करण्याची वेळ आली, त्यामुळे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची दिवाळी गोड होवू देऊ नका, त्यांना गावागावात काळे झेंडे दाखवा,’ असं आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलं आहे. महाविकास आघाडीवर हल्लाबोल करतानाच या आघाडीतून बाहेर पडण्याबाबत लवकरच निर्णय जाहीर करण्यात येईल, असा इशाराही शेट्टी यांनी दिला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद मंगळवारी जयसिंगपूर येथे पार पाडली. राज्याच्या विविध भागातून आलेल्या शेतकऱ्यांमुळे या परिषदेला प्रचंड गर्दी झाली. शेतकरी संघटना आणि शेट्टी यांच्या जयघोषात यावेळी अनेक ठराव मंजूर करण्यात आले. शेट्टी यांच्यासह प्रा. जालंधर पाटील, रविकांत तुपकर, अनिल मादनाईक, प्रकाश पोकळे या सर्वांनीच केंद्र, राज्य सरकारबरोबरच साखर कारखानदारांवर तोफ डागली. तसंच सर्वांनीच महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी केली.

MNS Opposes Fireworks Ban: दिवाळीत फटाकेबंदीला मनसेचा विरोध; रस्त्यावर फटाके फोडत दिला ‘हा’ इशारा

‘आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत यंदा साखर आणि इथेनॉलला अतिशय चांगला भाव आहे, त्यामुळे यंदा साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी म्हणून प्रति टनाला ३३०० रूपये पहिली उचल द्यावी,’ अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.

परिषदेत बोलताना माजी खासदार शेट्टी म्हणाले, गेल्या दहा वर्षातच प्रथमच साखर उद्योगाला अतिशय चांगले दिवस आले आहेत. याचा फायदा शेतकऱ्यांनी घेतला नाही तर आपल्यासारखा करंटा कुणी नसेल. त्यामुळे यंदा ऊसाच्या कांडीला सोन्याचा भाव घेतल्याशिवाय राहणार नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात साखर आणि इथेनॉलला चांगला भाव आला आहे. अजून वर्षभर हा भाव टिकण्याची शक्यता आहे. साखरेचे दर प्रति क्विंटल ३५०० रूपयांपेक्षा कमी येण्याची शक्यता नाही. यामुळे यंदा कोणतंही कारण न देता साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी म्हणून पहिली उचल प्रति टन ३३०० रूपये दिलीच पाहिजे. हा अंतिम दर नसेल. याशिवाय साखर व इथेनॉलचे दर पाहून आणखी मागणी करणार आहे, असं सांगून ते म्हणाले, या मागणीनंतर जानेवारीच्या आत फरकाची रक्कम न दिल्यास हंगाम मध्येच बंद पाडला जाईल.

चंद्रकांत पाटील PM मोदींचाही एकेरी उल्लेख करत असावेत; जयंत पाटलांचा टोला

शरद पवारांसह सरकारवर हल्लाबोल

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, राज्य आणि केंद्र सरकारवरही राजू शेट्टी यांनी हल्लाबोल केला. शेट्टी म्हणाले, साखर कारखान्यांना व्याजाचा बोजा पडतो म्हणून एफआरपीचे तुकडे करण्याचा प्रस्ताव पुढे केला. पवारांनीच पंतप्रधान मोदी यांच्या कानात हे सांगितलं असेल. पण नाबार्डने साखर कारखान्यांना ४ टक्के दराने कर्ज दिलं असतं तर हा बोजा पडला नसता. दहा वर्षे तुम्ही कृषीमंत्री होता, तेव्हा हा निर्णय का घेतला नाही? असा सवाल पवारांना करताना शेट्टी म्हणाले, मोदी अजूनही तुमचं ऐकतात. त्यामुळे आता तरी नाबार्डकडून कारखान्यांना चार टक्के दराने कर्ज देण्याचे धोरण निश्चित करा.

‘दोन पक्षाच्या भांडणात सर्वसामान्य वीजग्राहक, शेतकरी, पूरग्रस्त, अतिवृष्टीग्रस्तांचे प्रचंड नुकसान झालं. या सरकारने सर्वांना फसवलं आहे. त्यामुळे या आघाडीत राहायचे की नाही, यांच्याशी संबंध ठेवायचे की नाही याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल,’ असा इशारा देत महाविकास आघाडीत गेल्याचा पश्चाताप होत असल्याचंही राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here