हायलाइट्स:
- कॉलेज विद्यार्थ्यांसाठी २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत व्यापक लसीकरण मोहिम
- राज्यातील सुमारे ४० लाख महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे युद्धपातळीवर लसीकरण करणार
- राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची पत्रकार परिषदेत माहिती
राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहिम राबविण्याबाबत सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी २१ ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी ३ वाजता संयुक्त पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी टोपे बोलत होते.
टोपे म्हणाले, ‘राज्यातील कोविड-१९ संदर्भातील निर्बंध बऱ्यापैकी शिथील केले आहेत. सणाच्या पार्श्वभूमीवर लोक एकमेकांना भेटत आहेत, गर्दी करत आहेत. अशात जर दिवाळीनंतर करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका उद्भवला तर त्यापासून वाचण्याचं काम लसीकरणामुळे होणार आहे. महाराष्ट्रात सुमारे ७० टक्के लोकांना पहिला डोस दिलेला आहे. हे लसीकरण आपल्याला लवकरच पूर्णत्वाला न्यायचं आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून आलेल्या माहितीनुसार, साधारण ५ हजार संस्था आहेत. ३२ ते ३३ लाख विद्यार्थी यात शिक्षण घेत आहेत. यात खासगी, स्वायत्त अशा सर्व प्रकारच्या संस्थाचा समावेश करून साधारणपणे ४० लाख विद्यार्थी आहेत. कॉलेज हे घटक धरून कॉलेजच्या प्राचार्यांनी लसीकरणाची आकडेवारी एका ठराविक फॉरमॅटमध्ये उपलब्ध करून द्यायचा आहे. येत्या तीन दिवसात ही माहिती आरोग्य विभागाकडे येईल. त्यानंतर आरोग्य विभाग लसीकरणाचे नियोजन करेल. तीन ते चार दिवसात हे लसीकरण पूर्ण करता येऊ शकेल.’
‘कॉलेजमध्ये तीन रुम आवश्यक, काही कर्मचारी वर्ग, संगणक आणि काही फ्लेक्स अशी साधने लागतील. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण राहिले असेल, तर त्यांचेही यावेळी लसीकरण पूर्ण होईल. आरोग्य विभाग लसीकरणासाठी आवश्यक सर्व साधनसामग्री, कर्मचारी, डॉक्टर, रुग्णवाहिका उपलब्ध करेल. २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत हे मिशन सुरू राहील. १८ ते २५ वयोगटातली विद्यार्थ्यांचे अशा पद्धतीने लसीकरण झाल्यास या मोबाइल घटकाद्वारे होणाऱ्या संसर्गापासून आपल्याला बचाव करता येईल,’ असेही टोपे यावेळी म्हणाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times