अहमदनगर : पक्षविरोधी कारवाया करीत असल्याच्या आरोपावरून पदावरून निलंबित करण्यात आलेल्या अहमदनगर शहरातील बाळासाहेब भुजबळ यांनीच आता काँग्रेसच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. ‘प्रदेशाध्यक्षपदी राहिलेल्या या नेत्याने आपल्या नात्यातील मंडळींना पक्षात स्थान देत आपल्यावर अन्याय केला आहे. आपण ओबीसींचा मेळावा घेतल्यापासून आणि एका पदाधिकाऱ्याचा आघाडी धर्माच्या विरोधात काम करण्याचा सल्ला न ऐकल्याने पक्षात त्रास देण्यास सुरवात केली. त्यातून पुढे ही निलंबनाची कारवाई झाली आहे. या विरोधात आपण श्रेष्ठींकडे दाद मागत असून आठ दिवसांत फेरविचार न झाल्यास मुंबईत पक्ष कार्यालयासमोर उपोषण करणार आहोत,’ असा इशाराही भुजबळ यांनी दिला आहे.

अहमदनगर शहरातील ब्लॉक कमिटीचे अध्यक्ष असलेल्या भुजबळ यांना दोन दिवसांपासून पदावरून निलंबित करण्यात आले आहे. त्यानंतर आपली बाजू मांडण्यासाठी त्यांनी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. यामध्ये त्यांनी राज्याचे महसूलमंत्री आणि तत्कालीन प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावर त्यांचे नाव न घेता आरोप केले. तर थोरात यांचे भाचे आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्यावरही भुजबळ यांनी उघड आरोप केले. त्यांनी सांगितले की, ‘मी सुमारे वीस वर्षांपासून काँग्रेसचे निष्ठेने काम करीत आहेत.

आपल्यामुळेच शहरात काँग्रेसचे अस्तित्व कायम असल्याचे नेतेही मान्य करतात. ब्लॉक कमिटीच्या अध्यक्षपदी आपली नियुक्ती नव्हे तर सदस्यांमधून पक्षांतर्गत निवड झालेली होती. २० हजार ५०० सदस्यांची नोंदणी आपण केली होती. उत्कृष्ट अध्यक्ष म्हणून आपला मुंबईत सत्कार झाला होता. पडत्या काळातही आपण पक्षासोबत कायम राहिलो. लाभाच्या पदाची कधी अपेक्षा केली नाही. त्यामुळे आता पक्ष विरोधी ठरवून केलेली कारवाई जिव्हारी लागत आहे. मात्र, याची सुरवात मागील विधानसभा निवडणुकीच्यावेळीच झाली होती. पूर्वी आमदार संग्राम जगताप आणि काँग्रेसचे सत्यजित तांबे यांच्यात लढत झाली होती. त्यावेळी काँग्रेस म्हणून आम्ही तांबे यांचे मनापासून काम केले. पुढच्या निवडणुकीत आघाडी झाली. त्यामुळे आघाडीचे उमेदवार म्हणून जगताप यांचे काम करण्यास आम्हाला पक्षाने सांगितले. मात्र, तांबे यांनी एकदा बैठक घेऊन जगताप यांचे काम न करण्याचा सल्ला दिला. त्यांचा हा आदेश आघाडी धर्माच्या विरोधात होता, त्यामुळे आम्ही तो नाकारला.

‘हा रामदासभाई जिवंत असेपर्यंत भगव्याची साथ सोडणार नाही’, भर सभेत रामदास कदमांची गर्जना
तेव्हापासून मी आणि माझ्या समर्थकांना पक्षात डावलले जाऊ लागले आहे. पक्षात ठारवीक नेत्यांच्या नातलगांनाच पदे मिळत आहेत. त्यांच्या स्वीय सहायकांनाही पदे दिली जात आहेत. मधल्या काळात आपण एकदा ओबीसींचा मेळावा घेतला. माझ्याकडे ओबीसींच्या संघटननेचे पदही आले. तेव्हापासून आपल्याला आणखीच डावलेले जाऊ लागले. माझ्याऐवजी किरण काळे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली. तरीही आपण त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तयार झालो. मात्र, काळे यांनी आधी तांबे यांची परवानगी घ्या, मगच कार्यालयात या, असे सांगितले. तांबे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. तेव्हापासून आम्ही वेगळे कार्यालय थाटून काम पहात आहोत. याला जातीय राजकारणाचाही वास येतो’, असा आरोपही भुजबळ यांनी केला.

यासंबंधी केंद्रीय आणि राज्यातील पदाधिकाऱ्यांशी संपर्क केल्याचे सांगून भुजबळ म्हणाले, ‘ही कारवाई करताना प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्यावरही दबाव आणण्यात आला आहे. बऱ्याच गोष्टी त्यांच्या परस्पर होत आहेत. आपण जेव्हा त्यांना भेटलो, त्यावेळी संयुक्त बैठक घेऊन हा विषय मिटवू, असे ते म्हणाले होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा आपण आपली बाजू श्रेष्ठींकडे मांडली आहे. आठ दिवस वाट पाहणार आहोत. त्यानंतर आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात मुंबईत पक्षाच्या कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहोत,’ असेही भुजबळ यांनी सांगितले.

यावेळी त्यांच्यासोबत राजेश बाठिया, फिरोज खान, एम. आय. शेख, संतोष कांबळे, संजय झोडगे हे कार्यकर्ते उपस्थित होते. शहरातील अनेक जुने कार्यकर्ते आपल्यासोबत असल्याचा दावाही भुजबळ यांनी केला. ‘पक्षाने माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला १६ वर्षांपूर्वी शहराध्यक्ष पद दिले याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. मात्र, मला त्या पदावरून आणि पक्षातून काढण्यासाठी ज्या नेत्याने सातत्याने प्रयत्न केले ते पदाने, पैशाने कितीही मोठे असले तरी त्यांचे कार्य किती संकुचित आहे, हे यातून दिसून येते,’ असा आरोपही भुजबळ यांनी केला.
देश मर्जीवर नव्हे, अधिकारांवर चालतो; मुख्यमंत्र्यांचा केंद्र सरकारवर निशाणा

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here