हायलाइट्स:
- आर्यन खान ड्रग्ज प्रकरण
- भारताचे माजी अटर्नी जनरल मुकुल रोहतगी
- आर्यन खानला गेल्या तीन आठवड्यांपासून दिलासा नाही
- रोहतगी आणि त्यांची टीम लंडनहून मुंबईत दाखल
आतापर्यंत वकील सतीश मानेशिंदे हे आर्यनची बाजू मांडत होते. मानेशिंदे यांनी संजय दत्त आणि सलमान खान यांसारख्या अभिनेत्यांचीही प्रकरणं हाताळली आहेत. मात्र, आर्यन खानला जामीन न मिळाल्यानं अमित देसाई या दिग्गज वकिलांनी आर्यन खानच्या कायदेशीर टीममध्ये एन्ट्री घेतली. मात्र, यानंतरही आर्यनला जामीन न मिळू शकल्यानं आता या टीमला मुकुल रोहतगी कायदेशीर सहकार्य करण्यासाठी दाखल झाले आहेत. आर्यन खान प्रकरणात आज झालेल्या सुनावणीत सतीश मानेशिंदे, अमित देसाई आणि मुकुल रोहतगी हे तीनही कायदेतज्ज्ञ न्यायालयात हजर होते.
PHOTO: क्रूझवर छाप्यातही समीर वानखेडेंसोबत किरण गोसावी, फोटो व्हायरल
कोण आहेत मुकुल रोहतगी?
देशातल्या दिग्गज कायदेतज्ज्ञांत मुकुल रोहतगी यांचं नाव वरच्या क्रमांकावर आहे. गुन्हेगारी प्रकरणांतील कसब त्यांची खासियत आहे. त्यांचे पिता अवध बिहारी रोहतगी हे दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते.
– मुंबईच्या गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या रोहतगी यांनी योगेश कुमार सभरवाल यांचे ज्युनिअर म्हणून आपल्या करिअरला सुरूवात केली होती.
– १९९३ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाकडून त्यांना सीनिअर काऊन्सिलचा दर्जा मिळाला.
– १९९९ साली त्यांनी अॅडिशनल सॉलिसिटर जरनल पदाची जबाबदारी स्वीकारली. यावेळी केंद्रात अटल बिहारी वाजपेयी यांची सत्ता होती.
– २००२ साली गुजरात दंगलीनंतर सर्वोच्च न्यायालयात मुकुल रोहतगी यांनीच राज्य सरकारची बाजू मांडली होती.
– २०१४ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मुकुल रोहतगींकडे अॅटर्नी जनरल पदाची जबाबदारी सोपवली. १८ जून २०१७ पर्यंत रोहतगी यांनी देशाचे १४ वे अॅटर्नी जनरल म्हणून काम पाहिलं.
– २०१८ साली माहितीच्या अधिकाराखाली विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना, न्यायाधीश ब्रिजगोपाल लोया प्रकरणात मानधन म्हणून सीनिअर काऊन्सिल मुकुल रोहतगी यांना राज्य सरकारकडून १ कोटी २१ लाख रुपये देण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयासमोर महाराष्ट्र सरकारची बाजू रोहतगी यांनी मांडली होती.
आर्यन खान गेल्या २४ दिवसांपासून तुरुंगात
आर्यन खान तीन आठवड्यांहून अधिक काळापासून तुरुंगात आहे. २ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या तटावर एका जहाजावर एनसीबी अधिकारी समीन वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली टाकण्यात आलेल्या छाप्यानंतर आर्यन खान याला अटक करण्यात आली होती. आर्यनविरुद्ध नार्कोटिक्स ड्रग्ज आणि एनडीपीएससहीत अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत एनसीबीकडून २० जणांना अटक करण्यात आलीय.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times