जागतिक स्तरावर अशी अनेक उदाहरणे पाहायला मिळतील, ज्यातून वेळेची किंमत आणि वेळेच्या योग्य व्यवस्थापनामुळे माणसे यशाच्या शिखरावर पोहोचली आहेत. किंबहुना जगातील दिग्गज व्यक्तींनी आपल्या आयुष्यातील वेळेला महत्त्व देत प्रत्येक क्षणाचा उपयोग केल्याचेच आपल्याला दिसते. वेळेच्या व्यवस्थापनात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतच्या कालावधीचे नियोजन केले जाते. वेळच मिळत नाही, असा शब्दप्रयोग आपण शेकडो वेळा करतो आणि समोरच्या व्यक्तीने केलेला पाहतो. वास्तविक पाहता, खरेच आपल्याला मिळत नाही का? आपल्या प्रियजनांना भेटायला, त्यांच्या गप्पा मारायला आपण वेळ काढतोच. आपण कशा प्रकारे वेळेचा उपयोग करायचा, हे आपल्या हातात आहे. अन्यथा आपण विनाकारण व्यस्त राहतो आणि आपले जीवन भरकटते, असे प्रसिद्ध लेखिका पॅट होलिंगर यांनी म्हटले आहे.
आजच्या काळातील माणसाची दिनचर्या अशी बनली आहे, ज्यामुळे पहाटे ४ वाजता उठणे शक्य होत नाही. कारण व्यग्र दिनचर्येमुळे माणसाला झोपण्यासाठीच मध्यरात्रीचे एक किंवा दोन वाजतात. माणसाची जेवणाची वेळही रात्री ११ वाजण्यावर गेली आहे. त्यामुळे पहाटे ४ वाजता उठण्याची संकल्पनाच हळूहळू लोप पावत चालल्यासारखे दिसतेय. माणसाची आजची जीवनशैलीच पूर्णपणे बदलून गेली आहे. उठण्याची वेळ, कामाची वेळ, जेवणाच्या वेळा आणि झोपण्याची वेळ या गोष्टी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात. दररोजचे काम सुलभ व्हावे, असे वाटत असल्यास या कामाचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे ठरते. कामानंतर आराम आणि आरामानंतर पुन्हा काम असे सूत्र आचरल्यास जीवन मजेशीर होईल. काही लोक आरामावेळी काम करतात आणि काम करायच्यावेळी आराम. काही जण कितीही काम केले तरी थकत नाहीत आणि काही जण काही काम केले नाही तरी दमतात. थकवा हा कामामुळे नाही, तर चिंता, निराशा आणि समाधान नसल्यामुळे येतो, असे डेल कार्नेगी म्हणतात.
कामाच्या वेळेला काम केले पाहिजे. जेवायच्यावेळी अभ्यास करून चालणार नाही आणि अभ्यासाच्यावेळी जेवणे योग्य नाही. आपणच आपली दिनचर्या ठरवली पाहिजे आणि त्याचे काटेकोरपणे पालन करण्याचा संकल्प केला पाहिजे. वेळेचे व्यवस्थापन करून तो संकल्प आचरणात आणल्यास आरोग्य आणि विकास यामध्ये मोठे यश संपादन करता येऊ शकते. त्याचप्रमाणे व्यक्तिमत्त्व विकासाठीदेखील याचा चांगला वापर केला जाऊ शकतो. संयम बाळगला नाही, तर चिंता वाढते आणि चिंता वाढल्यास तणाव निर्माण होतो. याच तणावामुळे राग, चीड उत्पन्न होऊन आपले मोठे नुकसान होऊ शकते. संयम नसल्यामुळे एखाद्या गोष्टीमागे आपण केवळ धावत राहतो. कितीही काम केले, पैसा कमवला, तरी समाधान मिळत नाही. संयम म्हणजे केवळ वेळ देणे नाही, तर मिळालेल्या वेळेचा उपयोग शांतपणे विचार करण्याला देणे, योग्य ठरते, असे लेखक जॉयस मेयर यांनी म्हटले आहे.
आपल्याच जीवनाचे विश्लेषण करणे, त्याकडे पाहणे गरजेचे आहे. स्वयंनिरीक्षणाने आपल्याला जीवनात यश मिळवायचे आहे, पुढे जायचे आहे, विकास करायचा आहे, याबद्दल विचार करायला हवा. म्हणूनच स्वतःलाच स्वतःचा साक्षत्कार झाला पाहिजे. आत्मनिरीक्षणाचे फलित आत्मजागरूकतेमध्ये व्हायला हवे आणि यासाठीच वेळेचे व्यवस्थापन सर्वाधिक महत्त्वाचे आहे. आपला वाद जसा आपल्याशीच असतो, त्याचप्रमाणे आपण आपल्याशीच संवाद साधायला हवा. त्यात सर्व समस्यांचे निराकरण करण्याची ताकद आहे आणि यासाठी वेळ हा महत्त्वाचा घटक आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times