हायलाइट्स:
- कृषी विद्यापीठाचा पदवीदान समारंभ
- पवार व गडकरी यांना मानद डॉक्टरेट प्रदान
- राज्यपालांनी दोन्ही नेत्यांवर उधळली स्तुतीसुमने
राहुरी कृषी विद्यापीठात हा कार्यक्रम झाला. प्रमुख पाहुणे म्हणून कृषी मंत्री दादाजी भुसे, जयपूरच्या महाराणा प्रताप विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नरेंद्र सिंह राठोड उपस्थित होते. राहुरी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर गडकरी, पवार यांच्यासह विद्यापीठाच्या स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या.
यावेळी बोलताना राज्यपाल म्हणाले की, ‘पवार आणि गडकरी हे देशाचे चमकते तारे आहेत. त्यांच्यासाठी ही पदवी फार मोठी नाही, या पलीकडचे त्यांचे काम आहे. हे दोघेही केवळ कृषी नव्हे तर विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. पवार यांचे कृषी आणि सहकार क्षेत्रातील मोठे योगदान सर्वांनाच ठावुक आहे. त्यासोबतच गडकरी अनेक क्षेत्रांत कार्यरत आहेत. त्यांचे काम प्रेरणादायी आहे. दररोज जसा नवा सूर्य उगवतो, तसे गडकरी नवा विचार घेऊन येतात, तो प्रत्यक्षात आणण्यासाठी धडपड करतात. माझी अशी धारणा आहे, ही आपण जे चांगले आहे, ते कोठूनही स्वीकारले पाहिजे. त्यामुळे विद्यापीठांनी या दोघांच्या ज्ञानाचा वापर करून घेतला पाहिजे,’ असंही राज्यपाल म्हणाले.
कृषी क्षेत्राबद्दल ते म्हणाले, ‘महाराष्ट्र कृषी क्षेत्रात अग्रेसर आहे. आम्ही उत्तराखंडमधील शेतकऱ्यांना येथे येऊन मार्गदर्शन घेण्यास सांगत असतो. येथील शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा करून घेतला पाहिजे. त्यामुळे उत्पन्न वाढल्याचं सांगणारे शेतकरीही आपल्याला भेटतात. मुळात शेती हा शेवटचा पर्याय ठरू नये. जुन्या काळात उत्तम शेती, मध्यम व्यवसाय आणि कनिष्ठ नोकरी असे सांगत. त्याचा विचार करून पदवीधरांनी शेतीला प्राधान्य देत नवं संशोधन केलं पाहिजे. करोनाच्या साथीच्या काळात जेव्हा बाकी सर्व व्यवहार ठप्प झाले होते, तेव्हा फक्त शेती सुरू होती. शेतीनेच आपली अर्थव्यवस्था सावरली आणि आपल्याला जिवंत ठेवले, हे विसरता कामा नये. संत गाडगेबाबांच्या ग्राम गीतेत शेतीचे महत्व सांगितलं आहे. नव्याने पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्यांनी यातून प्रेरणा घेतली तर तुमची आणि देशाचीही प्रगती होईल,’ असा विश्वासही राज्यपालांनी व्यक्त केला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times