हायलाइट्स:
- एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण मागे घेतलं
- सरकारकडून दोन प्रमुख मागण्या मान्य
- प्रवाशांना मोठा दिलासा
आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केल्याने ऐन दिवाळीच्या काळात प्रवाशांची मोठी कोंडी झाली होती. त्यानंतर राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळ राष्ट्रपती अनिल परब यांनी कृती समितीला चर्चेसाठी बोलावलं. सणासुदीच्या दिवसात एसटी बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय झाल्याने मंत्री परब यांनी पुढाकार घेतला. यावेळी झालेल्या चर्चेनंतर कर्मचाऱ्यांच्या संघटनेनं आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला.
एसटी कर्मचाऱ्यांना १२ टक्के महागाई भत्ता मिळतो. तो शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के देण्यात यावा, अशी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी होती. काही दिवसांपूर्वी हा महागाई भत्ता ५ टक्के वाढवून १७ टक्के करण्यात आला होता. मात्र ही अत्यल्प वाढ मान्य नसल्याने २७ ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांच्या कृती समितीने बेमुदत उपोषण सुरू केले होते.
राज्यातील काही ठिकाणी चालक-वाहकांनी सेवा देण्यास नकार दिल्याने बसेस डेपोतच थांबल्या होत्या. नागपुरातही गुरुवारी ४ गाड्या रद्द कराव्या लागल्या होत्या. मात्र सायंकाळी दोन प्रमुख मागण्या मान्य झाल्याचे व तिसरी मागणी दिवीळानंतर मान्य करण्याचे आश्वासन मिळाल्याचे वृत्त येताच कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त करून आपले आंदोलन मागे घेतले.
दरम्यान, वार्षिक वेतन वाढ शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे ३ टक्के करावी, ही मागणी दिवाळीनंतर मान्य करण्याचे आश्वासन कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींना देण्यात आले आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times