हायलाइट्स:
- टू-जी स्पेक्ट्रम वाटप प्रकरणाचा वाद
- कॅग अहवालातून काँग्रेस नेत्यांकडून माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचं नाव वगळण्यासाठी दबाव
- नकळत संजय निरुपम यांच्या नावाचाही उल्लेख झाल्याचं म्हणत विनोद राय यांचा माफीनामा
२०१४ मध्ये माजी नियंत्रक आणि महालेखा परीक्षक विनोद राय यांनी आपल्या पुस्तकातून हे आरोप केलं होते तसंच मीडियाला दिलेल्या मुलाखतींत त्यांनी या आरोपांचा पुनरुच्चार केला होता. यानंतर संजय निरुपम यांनी विनोद राय यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता.
पटियाला हाऊसमध्ये मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटच्या न्यायालयासमोर विनोद राय यांनी संजय निरुपम यांची बिनशर्त माफी मागितली आहे. निरुपम यांनीही राय यांच्या माफीचा स्वीकार केल्यानं हे प्रकरण आता निकालात निघालंय.
संजय निरुपम यांचे वकील आर के हांडू यांनी दिलेल्या माहितीनुसार, निरुपम यांनी माफीचा स्वीकार केल्यानं विनोद राय यांची या प्रकरणातून सुटका करण्यात आलीय.
माजी कॅग राय यांनी न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्रात आपली चूक स्वीकार केलीय. ‘लोकलेखा समितीच्या बैठकांत किंवा संयुक्त संसदीय समितीच्या बैठकांशिवाय इतर बैठकांत टू-जी स्पेक्ट्रम वाटपासंबंधी कॅगच्या अहवातून तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या नाव वगळण्यासाठी दबाव टाकणाऱ्या नेत्यांत आपण नकळत आणि चुकीच्या पद्धतीनं संजय निरुपम यांच्या नावाचा अगोदर उल्लेख केला होता’ असं राय यांनी म्हटलंय.
‘माझ्या वक्तव्यामुळे संजय निरुपम, त्यांचे कुटुंबीय आणि शुभचिंतकांना त्रास झाला, यासाठी मी त्यांची बिनशर्त माफी मागतो. मला आशा आहे की संजय निरुपम माझ्या बिनशर्त माफीचा विचार करतील, स्वीकार करतील आणि हा मुद्दा निकालात काढतील’, असंही राय यांनी आपल्या शपथपत्रात म्हटलंय.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times