हायलाइट्स:
- मासेमारी करणारी ‘नावेद २’ ही बोट बेपत्ता
- २६ ऑक्टोबरपासूनच बोट बेपत्ता
- प्रशासनाकडून युद्धपातळीवर बेपत्ता बोटीचा शोध सुरू
खोल समुद्रात प्रशासनाच्या तीन स्पीड बोटी, कोस्टगार्डची एक स्पीड बोट व काही खासगी बोटी यांच्याकडून युद्धपातळीवर बेपत्ता बोटीचा शोध घेतला जात आहे. मात्र अद्याप कोणताही संपर्क झाला नसल्याने चिंतेचं वातावरण आहे.
‘नावेद २’ ही बेपत्ता असलेली ही बोट २६ ऑक्टोबर मंगळवारी सायंकाळी उशिरा जयगड येथून मासेमारीसाठी समुद्रात गेली होती. तब्बल पाच दिवसानंतरही बोट बेपत्ता आहे. सदर नौका किनाऱ्यावर आलेली नाही व कोणत्याही प्रकारे संपर्क होत नसल्याने मालक संसारे यांनी जिल्हा प्रशासनाला याची माहिती दिली आहे. या बोटीमध्ये सहा जणही होते. त्यांचा शोध सुरू आहे.
बोटीमध्ये असलेल्या व्यक्तींमध्ये दगडू तांडेल नामक मुख्य चालक असून गोविंद नाटेकर, दत्ता, सूर्या, अनिल, अमोल या नावाच्या चार जणांचाही समावेश आहे. हे सगळे गुहागर तालुक्यातील रहिवासी आहेत.
दरम्यान, रात्री उशिरा एक मृतदेह हाती लागला असून तो नक्की बेपत्ता बोटीमधील व्यक्तीचाच आहे की अन्य कोणाचा आहे, याबाबतची खातरजमा करण्याचे काम सुरू आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times