हायलाइट्स:
- कॉंग्रेस पक्षाच्या सदस्य नोंदणीला सोमवारपासून सुरुवात
- मोदी सरकारविरोधात नाना पटोले पुन्हा आक्रमक
- अनेक गंभीर आरोप केले
‘करोनासारख्या महामारीत केंद्रामध्ये बसलेल्या सरकारने वेळीच लसीकरण करून करोनाला रोखलं असतं, लशींची बोली लावली नसती तर अनेकांचा जीव वाचवता आला असता. अनेक उद्योग धंदे बंद झाले, ते आपल्याला थांबवता आले असते. शेतकरी बरबाद होताना त्याला थांबवता आलं असतं. पण करोना या देशांमध्ये पद्धतशीरपणे पसरवून शेतकऱ्यांच्या विरोधातले तीन काळे कायदे कसे आणता येईल यासाठी मोदी सरकारने प्रयत्न केले,’ असा खळबळजनक आरोप नाना पटोले यांनी गडचिरोलीत केला.
‘करोनाच्या काळात लोक घरात आहेत ही संधी पाहून इंग्रजांनी ज्या पद्धतीने कायदे केले नसतील त्यापेक्षा भयानक कायदे मोदी सरकारने केले. त्यामुळे देश विकणारं सरकार म्हणून मोदी सरकारची इतिहासात नोंद होणार आहे,’ असंही नाना पटोले यांनी म्हटलं.
यावेळी नाना पटोले यांनी काँग्रेसचे संघटन आणखी मजबूत करण्यासाठी गावपातळीला जाऊन काँग्रेसचे सदस्य नोंदणी करा व पक्षाची ताकद वाढवा, असं आवाहन कार्यकर्त्यांना केलं.
दरम्यान, गडचिरोलीतील या कार्यक्रमाला पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, आमदार अभिजीत वंजारी, गडचिरोलीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मनवाडे, प्रवक्ते अतुल लोंढे, नामदेव ऊसंडी आणि काँग्रेसचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times