हायलाइट्स:
- महागाईवरून केंद्रातील मोदी सरकारवर टीका
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांगली जिल्हा महिला आघाडीने लिहिलं मोदींना पत्र
- महागाई कमी करण्याची केली मागणी
वाढलेले दर ५० टक्क्यांनी कमी करावेत किंवा दिवाळीत भाऊबीज म्हणून गॅस सिलिंडर, खाद्यतेल आणि डाळींची भेट द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे केली आहे. या पत्राची प्रत सांगलीतील भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्याकडे देण्यात आली.
गेल्या वर्षभरात खाद्य तेलाच्या दरात सातत्याने वाढ सुरूच आहे. सणासुदीच्या दिवसात या दरात काहीशी घट झाली. मात्र अजूनही खाद्य तेलाचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात नाहीत. व्यावसायिक कारणांसाठी वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलिंडरच्या दरात अचानक तब्बल २६८ रुपयांची वाढ झाली, तर घरगुती गॅस सिलिंडरचा दर हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तूंपैकी डाळींचे दर प्रति किलो ११० ते ११५ रुपयांवर पोहोचले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दराचे तर रोज नवे विक्रम सुरूच आहेत.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून वाढलेले दर ५० टक्क्यांनी कमी करण्याची मागणी केली. अन्यथा दिवाळीला गॅस सिलिंडर, खाद्य तेल आणि डाळी भाऊबीजेची भेट म्हणून द्या, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या महिला आघाडीने नरेंद्र मोदींना पाठवलेल्या पत्राची प्रत सांगलीतील भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनाही दिली. यावेळी सांगली जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सुस्मिता जाधव यांच्यासह विनया पाठक, ज्योती आदाटे, कमलताई पाटील, सुनिता देशमाने, साधना पाटील, आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times