नवी दिल्लीः माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदम्बरम यांनी येस बँकेच्या मुद्द्यावरून पुन्हा केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. येस बँकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी SBIने आणलेली योजना निव्वळ कुचकामी आहे. ज्या बँकेचे मूल्य शून्य आहे अशा बँकेचे १० रुपये दराने प्रति शेअर विकत घेणं ही योजना विचित्र आहे. येस बँक खरेदी करण्यासाठी एसबीआयला स्वेच्छेने पुढे आलेली दिसून येत नाहीए. तिच्यावर दबाव टाकण्यात आलाय, असा आरोप चिदम्बरम यांनी केला. आर्थिक संकटात सापडलेल्या येस बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले आहेत. तसंच येस बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नेमणूक केली आहे.

मागील यूपीए सरकारमुळे येस बँक आर्थिक संकटात आली आहे, असा आरोप केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला होता. तसंच माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांच्या कार्यकाळात बँकांना संटकात आणले, असं सीतारामन म्हणाल्या होत्या. या आरोपालाही चिदम्बरम यांनी उत्तर दिलंय. अर्थमंत्र्यांचं वक्तव्य ऐकल्यावर असं वाटतं की यूपीए अजूनही सत्तेत आहे. मी अजूनी अर्थमंत्री आहे आणि ते विरोधी पक्षात आहेत. चुकीचे व्यवस्थापन केलेने ही वेळ आली आहे. यामुळे एकामागून एक संकटं येत आहेत, असा टोला चिदम्बरम यांनी भाजप सरकारला लगावला.

पी. चिदम्बरम यांनी शुक्रवारीही केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. भाजप सरकारने गेल्या ६ वर्षांत वित्तीय संस्थांवर नियंत्रण आणि अनियंत्रित करण्याचा खेळ केला. यातून त्यांची क्षमता सिद्ध होते. आधी पीएमसी बँक आणि आता येस बँक बुडाली. याबाबत सरकारला कुठलीही चिंता नाही. सरकार जबाबदारी झटकतेय का? आता पुढे कुठल्या बँकेचा नंबर आहे?, असा प्रश्न चिदम्बरम यांनी केला होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here