हायलाइट्स:
- महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील भीषण दुर्घटना
- रुग्णालयात लागलेल्या आगीत १० रुग्णांचा मृत्यू
- राष्ट्रपती, पंतप्रधानांनी पीडित कुटुंबीयांप्रती संवेदना केल्या व्यक्त
‘महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत लोकांच्या मृत्यूची बातमी अत्यंत दु:खद आहे. मी शोकसंतप्त कुटुंबांप्रती हार्दिक संवेदना व्यक्त करतो तसंच दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांसाठी लवकरात लवकर बरं होण्याची कामना करतो’, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलंय.
‘महाराष्ट्राच्या अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत लोकांच्या मृत्यूनं दु:खी आहे. शोकसंतप्त कुटुंबीयांप्रती संवेदना. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत’ अशी कामना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलीय.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यानी आज अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातील आयसीयू वॉर्डमध्ये लागलेल्या आगीवर शोक व्यक्त केला आहे तसंच या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
तर, ‘प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना पाच – पाच लाख रुपये देण्यात येतील. तसंच या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून आठवड्याभरात अहवाल सादर होईल’, अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलीय.
शनिवारी सकाळी साडे दहा वाजल्याच्या सुमारास अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयूमध्ये भीषण आग लागली. या घटनेतील १० मृत कोविड रुग्ण होते. आग लागली त्यावेळी रुग्णालयात १७ रुग्ण होते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times