हायलाइट्स:
- मुंबई महानगरपालिका निवडणुकीआधी सरकारचा मोठा निर्णय
- मुंबईत नगरसेवकांची संख्या वाढणार
- शहरात नगरसेवकांची संख्या वाढून २३६ इतकी होणार
मुंबई महानगरपालिकेत सध्या नगरसेवकांची संख्या २२७ एवढी आहे. राज्य सरकारच्या नव्या निर्णयानंतर आता ही संख्या वाढून २३६ इतकी होणार आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीआधी सरकारने घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
राज्य सरकारने प्रभागांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला असून अध्यादेश काढण्यात आल्यानंतरच प्रभाग फेररचना करण्यात येणार आहे.
प्रभाग संख्या वाढवण्यामागे काय आहे सरकारची भूमिका?
राज्यात शहरी भागात झपाट्याने लोकसंख्या वाढत असून, त्यामुळे नागरी विकास योजनांचा वेग वाढवण्याची गरज लक्षात घेऊन महापालिका व नगरपरिषदांमधील निर्वाचित सदस्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाकडून ऑक्टोबरमध्येच घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील महापालिका व नगरपरिषदांच्या नगरसेवकांच्या सदस्यसंख्येत १७ टक्के वाढ करण्यात आली. मात्र तेव्हा मुंबई महानगरपालिकेबाबत निर्णय घेण्यात आला नव्हता.
महानगरांमधील आणि लहान नागरी क्षेत्रांमध्ये झालेले रचनात्मक परिवर्तन व नागरी समस्यांची उकल करणे व विकास योजनांचा वेग वाढवणे यासाठी सर्व कार्यक्षेत्राला योग्य न्याय देण्याच्या दृष्टीने सदस्यसंख्या वाढवण्याची आवश्यकता आहे. त्यानुसार हा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे, असं राज्य सरकारने तेव्हा स्पष्ट केलं आहे. या पार्श्वभूमीवरच मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग संख्येत वाढ करण्यात आली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times