हायलाइट्स:
- निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवून चौघांना अटक
- तपासात आढळून आलेल्या पुराव्यांबद्दल पोलिसांनी दिली माहिती
- जबाबदारी पार पाडण्यात गंभीर निष्काळजीपणा केल्याचं उघड
या प्रकरणी माहिती देताना जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितलं की, ‘ज्यांच्याविरूद्ध पुरावे आढळून आले, त्यांना अटक केली आहे. आग कशी लागली हा वेगळा भाग आहे. मात्र, आगीनंतर या कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी पार पाडण्यात गंभीर निष्काळजीपणा केल्याचं तपासात आढळून आलं आहे. त्यामुळे त्यांना अटक केली. समितीची चौकशी वेगळी आणि पोलिसांचा तपास वेगळा. त्यामुळे चौकशीचा अहवाल येऊपर्यंत पोलिसांनी थांबलं पाहिजे, ही मागणी चुकीची आहे. जर आग लागलेल्या ठिकाणी कोणीच जाऊ शकणार नाही, अशी परिस्थिती असती तर वेगळा विचार झाला असता. मात्र, येथे अन्य व्यक्ती आत जाऊन आपल्या रुग्णांना बाहेर आणत होत्या. मात्र, ज्यांच्यावर जीव वाचवण्याची जबाबदारी आहे, ते आरोग्य कर्मचारी असं करताना आढळून आले नाहीत. त्यामुळे नाइलाजाने कारवाई करावी लागली,’ असं स्पष्टीकरण पाटील यांनी दिलं आहे.
‘…तर अनेकांचे जीव वाचू शकले असते’
‘रुग्णांपैकी तिघांना भाजलेलं आहे, बाकीच्यांना नाही. म्हणजे त्यांना वाचवता येणं शक्य होते. कर्मचारी कोणालाच वाचवत असल्याचं दिसून आलं नाही. तेथे पाच जणांची नियुक्ती होती. त्यातील कोणी हजर कोण गैरहजर होते, हा भाग वेगळ्या चौकशीचा आहे. मात्र, दाखल केलेल्या गुन्ह्याचा विचार करता ज्यांची जबाबदारी होती, त्यांनी ती नीट पार पाडली नाही, हे पुराव्यासह दिसून आले. एकूण १२ ते १५ मिनिटांचा कालावधी त्यांना मिळाला होता. त्या काळात ते अनेकांचे जीव वाचवू शकले असते. तपासाची व्याप्ती मोठी आहे. आणखी आरोपी वाढू शकतात. सध्या कोणीही ताब्यात नाही. समितीचे निष्कर्ष आले तर ते आमच्यासाठी उपयुक्त ठरतील. मात्र, त्यासाठी थांबण्याची कायद्यात तरतूद नाही. दाखल गुन्ह्याचा तपास आम्ही करत आहोत. पोलिसांचा हा भाग कर्मचारी संघटना आणि नागरिकांनी समजून घ्यावा. आंदोलन करण्याचा त्यांना अधिकार आहे, त्यावर आम्ही काही बोलणार नाही. मात्र, आंदोलनाचा तपासावर परिणाम होणार नाही,’ असं पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितलं आहे.
अटकेतील कर्मचाऱ्यांना २ दिवस पोलीस कोठडी
अटकेत असलेले वैद्यकीय अधिकारी विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख आणि चन्ना आनंत यांना तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी न्यायालयात हजर केले. यावेळी तपासासाठी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली. आरोपींच्या वकिलांनी तसंच सन्मानीय नागरिक प्रतिष्ठानतर्फे सामाजिक कार्यकर्ते प्रमोद मोहोळे यांनीही हस्तक्षेप अर्ज दाखल करून आरोपींच्या बाजूने युक्तिवाद केला. मात्र, न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times