याशिवाय, दिल्लीत २३ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी दरम्यान झालेल्या हिंसा प्रकरणांत पोलिसांना आणखीन एक यश हाती लागलंय. त्रिलोकपुरी भागातून पोलिसांनी दानिश नावाच्या एका इसमाला अटक केलीय. स्पेशल सेलकडून मिळालेल्या माहितीनुसार, दानिश ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चा (पीएफआय) दिल्लीचा इन्चार्ज आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधी (सीएए) आंदोलनादरम्यान त्यानं जाणून-बुजून लोकांच्या भावना भडकावत हिंसा पसरवली, असा त्याच्यावर आरोप आहे.
दुसरीकडे, उत्तर पूर्व दिल्लीत झालेल्या दंगलीमध्ये आयबीचे अधिकारी अंकित शर्मा यांची हत्या आणि दंगल प्रकरणात अटक करण्यात आलेल्या ताहिर हुसैन यांच्याकडून क्राईम ब्रान्चच्या हाती काहीही लागलेलं नाही.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ताहिर यांचा एक मोबाईल कदाचित या प्रकरणाला वेगळं वळण देऊ शकतो. या मोबाईलमधून काही व्हॉटसअप मॅसेज किंवा इतर मॅसेजच्या साहाय्यानं दंग्यात ताहिर यांची नेमकी काय भूमिका होती? याचा थांगपत्ता लागू शकेल, अशी त्यांना आशा आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, ताहिर हुसैन यांनी मात्र अंकित शर्मा हत्याकांडात आपला कोणत्याही पद्धतीनं हात असल्याचा आरोप फेटाळून लावलाय.
दिल्ली दंगली प्रकरणात आत्तापर्यंत तब्बल ७०२ एफआयआर नोंदविण्यात आल्या आहेत. तर २३८७ जणांना ताब्यात घेण्यात आलंय. या दंगलीदरम्यान जखमी झालेले काही जण अद्यापही रुग्णालयात उपचार घेत आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times