एसटी संपाच्या विवंचनेतून ही घटना घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मृत पाटील यांच्या मृतदेहावर कवलापूर या मूळगावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या घटनेने राज्य सरकारच्या विरोधात एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. मृत आर एन पाटील हे १७ वर्षांपासून एसटी सेवेत वाहक म्हणून काम करत होते. एसटी संपाच्या पहिल्या दिवशी ते आंदोलनात सहभागी झाले होते. त्यानंतर ते गेली तीन दिवस आंदोलनाकडे आले नाहीत.
या दरम्यान ते एसटीच्या संपाबाबत सर्व कर्मचारी यांच्याशी सातत्याने संपर्कात होते. तर आपल्या नोकरीबाबत ते विवंचनेत होते. एसटीचा संप लांबत चालल्याने पाटील हे तणावात होते. आज सकाळी ते घरीच असताना त्यांना चक्कर आली. यावेळी नातेवाईकांनी त्यांना तात्काळ सांगली सिव्हील हॉसेपिटलमध्ये दाखल केले. मात्र त्याठिकाणी त्यांना मृत म्हणून घोषित करण्यात आले. या घटनेची माहिती कळताच संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी सांगली सिव्हीलला धाव घेतली. तसेच मृत वाहक आरएन पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी मृत पाटील हे एसटी संपामुळे तणावाखाली होते. यातूनच त्यांना त्रास झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तर मृतदेह त्यांच्या मूळगावी पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
एसटीचा संप लांबत चालल्याने एसटी कर्मचारी तणावाखाली असल्याने आशा घटना यापुढे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सरकारने संपावर तोडगा काढावा आणि मृत वाहकाच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे अशी मागणी भाजपानेते पृथ्वीराज पवार यांनी केली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times