हायलाइट्स:
- मुंबईतील चेंबूर परिसरात धक्कादायक घटना
- बोलण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीची केली हत्या
- लग्नानंतर चार महिन्यांनीच त्यांच्यात सुरू झाले होते वाद
- पोलिसांनी आरोपी पतीला केली अटक
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या चेंबूरमधील अशोक नगर भागात ही घटना घडली. रिक्षात बसलेल्या पत्नीने बोलण्यास नकार दिला म्हणून रागाच्या भरात पतीने तिची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. या घटनेने परिसर हादरला आहे. आरसीएफ पोलिसांनी तात्काळ कारवाई करून आरोपी पतीला अटक केली आहे.
आकांक्षा असे या महिलेचे नाव आहे. नुकताच तिनं आपला २१ वा वाढदिवस साजरा केला होता. आठवडा उलटत नाही तोच, आकांक्षाची हत्या झाली. चेहऱ्यावर नेहमी हसू असलेल्या आकांक्षाच्या हत्येनं तिचं कुटुंब हादरले आहे. तिच्या पालकांना मोठा धक्का बसला आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, अक्षय आणि आकांक्षा यांचे लग्न २०१९ मध्ये झाले होते. दोघांनी कोर्टात लग्न केले होते. लग्न झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस दोघेही आनंदात होते. मात्र, त्यानंतर त्यांच्या आनंदात वादाच्या ठिणग्या पडू लागल्या. दोघांमध्ये नेहमी खटके उडू लागले. लग्नाच्या चार महिन्यांनंतर ती आपल्या माहेरी राहण्यासाठी आली.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी आकांक्षा काही कामानिमित्त बाहेर जात होती. अक्षय याने दुचाकीवरून ती ज्या रिक्षात बसली होती, तिचा पाठलाग केला. अशोक नगरमध्ये त्याने रिक्षा रस्त्यात थांबवली. त्यानंतर तो रिक्षात बसण्याचा प्रयत्न करू लागला. अक्षयला तिच्याशी काहीतरी बोलायचे होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून आकांक्षाने त्याच्याशी बोलण्यास नकार दिला. यावरून त्याला राग अनावर झाला. त्याने तिच्यावर जीवघेणा हल्ला केला आणि घटनास्थळावरून पसार झाला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times