हायलाइट्स:
- मणिपूरच्या सूरज चंद जिल्ह्यातील घटना
- लष्करी अधिकारी, पत्नी आणि मुलगा ठार
- हल्ल्यात ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’चा हात असल्याची शक्यता
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी १०.०० वाजल्याच्या सुमारास सूरज चंद जिल्ह्याच्या म्यानमार सीमेजवळ सिंगनगट उपखंडातील एस सेहकेन गावात ही घटना घडलीय. या भागातून लष्करी अधिकाऱ्यांचा ताफ जात असताना आधीपासूनच लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणला.
कर्नल विप्लव त्रिपाठी (कमांडिंग ऑफिसर – ४६ एआर), त्यांची पत्नी आणि या जोडप्याचा मुलगा अशा तिघांचा हल्ल्यात जागीच मृत्यू झाला. तसंच या हल्ल्यात आणखी तीन ‘क्विक रिअॅक्शन टीम’ (QRT) सदस्यांचाही मृत्यू झाला.
इतर जखमींना बेहियांग प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलवण्यात आलंय. कथितरित्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनांना दहशतवाद्यांनी निशाण्यावर घेतलं. लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, क्यूआरटीम सोबत अधिकारी कुटुंबाचे सदस्यांचाही या ताफ्यात समावेश होता. राज्याचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी ही घटना ‘भ्याडपणाचे प्रतीक’ असल्याचं सांगत तीव्र निंदा केलीय.
या घटनेमागे मणिपूरच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’चा हात असल्याचं सांगितलं जातंय. स्वतंत्र मणिपूरची मागणी करत १९७८ मध्ये या संघटनेची स्थापना झाली होती. बिश्वेसर सिंह यानं या संघटनेचं नेतृत्व केलं होतं. भारत सरकारनं या संघटनेला ‘दहशतवादी संघटना’ घोषित केलंय. मणिपूरमध्ये या संघटनेकडून भारतीय सुरक्षादलावर वारंवार हल्ले करण्यात येतात.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times