हायलाइट्स:
- अमरावतीत जीवनावश्यक वस्तू व्यवहारासाठी मुभा
- दुपारी २ ते ४ या वेळेत निर्बंधांमध्ये शिथिलता
- प्रशासनाने घेतला निर्णय
शहरातील वातावरण बिघडवणे व अनुचित प्रकाराला जबाबदार व्यक्तींविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात २६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकूण १३२ संशयितांना अटक करण्यात आली आहे. समाजमाध्यमांद्वारे चुकीच्या माहितीचा प्रसार होऊ नये यासाठी १६ नोव्हेंबरपर्यंत सर्व इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. तसंच अमरावती शहरातील सर्व नागरिकांनी शांतता राखण्याचं आवाहन शहराच्या पोलीस आयुक्तांनी केलं आहे.
संचारबंदीच्या काळात नागरिकांना होत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन आता प्रशासनाने दुपारी २ तासांसाठी संचारबंदीत शिथीलता देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १६ नोव्हेंबर रोजी दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची खरेदी, दूधवितरण आदी व्यवहार, तसंच शासकीय व निमशासकीय परीक्षा देण्यासाठी पात्र असलेल्या व परीक्षेचे ओळखपत्र असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळेनुसार सवलत देण्यात आलेली आहे.
दरम्यान, अंजनगाव सुर्जी शहरात पुढील आदेशापर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे. अचलपूर, परतवाडा शहर व कांडली देवमाळी ग्रामपंचायत क्षेत्रात सोमवार १५ नोव्हेंबरपासून रात्री ७ ते सकाळी ७ या वेळेमध्ये संचारबंदी लागू राहील याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times