हायलाइट्स:
- आणखी एका एसटी कर्मचाऱ्याने प्राण गमावले
- हृदयविकाराच्या झटक्याने झाला मृत्यू
- कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर प्रशासनावर गंभीर आरोप
एसटी कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर प्रशासनावर गंभीर आरोप करण्यात आला आहे. निलंबनाच्या भीतीमुळे किरण घोडके यांचा मृत्यू झाल्याचा आरोप सहकारी कर्मचाऱ्यांनी केला आहे. किरण हे अक्कलकोट आगारात चालक या पदावर कार्यरत होते. सध्या सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात ते सहभागी होते.
राज्य सरकारने आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाच्या कारवाया सुरू केल्या आहेत. आपल्या इतर सहकाऱ्यांवर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईमुळे किरण घोडके हे देखील अस्वस्थ झाले होते. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. निलंबनाची कारवाई होईल या भीतीतून त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे.
संसार उघड्यावर…
किरण घोडके यांचे वडीलही एसटी कर्मचारी होते. वडिलांचंही दोन वर्षांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. किरण घोडके हे सध्या कुटुंबात एकमेव कमावणारे व्यक्ती होते. त्यांच्या पश्चात आई ,पत्नी , भाऊ , २ वर्षाची मुलगी आहे. घरी परस्थिती बेताची असून कर्ता व्यक्ती गेल्याने कुटुंब उघड्यावर आलं आहे.
दरम्यान, संप काळात काही एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं आहे. तसंच कोल्हापूर जिल्ह्यातील संपात सहभागी असणाऱ्या एका एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यावेळीही निलंबनाच्या भीतीनेच सदर कर्मचारी तणावात होता आणि त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा दावा मृत कर्मचाऱ्याच्या नातेवाईकांनी केला होता.
एसटी संपावर तोडगा कधी?
राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू होऊन २० दिवसांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. मात्र अद्याप या कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यात सरकारला यश आलेलं नाही. या काळात एसटी कर्मचारी तणावात असल्याचं चित्र आहे. तसंच एसटी बससेवेवर अवलंबून असलेल्या प्रवाशांचेही हाल होत आहेत. त्यामुळे सरकार आणि एसटी कर्मचाऱ्यांमध्ये एकमत कधी होणार, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times