हायलाइट्स:
- उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यात दुहेरी हत्याकांड
- गावातील मंदिरात पुजारी आणि साध्वीचा मृतदेह आढळला
- पोलिसांनी गुन्हा दाखल करून सुरू केला तपास
- हत्यामागील कारण अद्याप स्पष्ट नाही, पोलिसांची माहिती
पोलिसांच्या माहितीनुसार, महदेईया गावातील रामरतन मिश्र यांनी गावात स्वखर्चाने मंदिर उभारले होते. या मंदिरात गेल्या २५ वर्षांपासून नेपाळमधील ढकधइया चेनपुरवा येथील महिला कलावती (वय ६८) राहायची. ती या मंदिरात पूजा करायची. काही दिवसांपूर्वी पुजारी रामरतन मिश्र यांनी वाराणसीहून हनुमानाची मूर्ती घेऊन आले होते. मूर्तीची मंदिरात प्रतिष्ठापना केल्यानंतर त्यांनी भंडाऱ्याचे आयोजन केले होते.
शुक्रवारी सकाळी ग्रामस्थ मंदिरात गेले तेव्हा पुजारी आणि साध्वीचा मृतदेह तिथे आढळून आला. एखाद्या अवजड वस्तूने त्यांची दोघांची हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. ही हत्या कोणत्या कारणांमुळे करण्यात आली, याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. पुजारीचे दोन भाऊ आहेत. काही दिवसांपूर्वी रोहिन बैराज येथे त्यांच्या एका जमिनीचा व्यवहार झाला होता. त्याबदल्यात त्यांना १४ लाख रुपये मिळाले होते. याबाबत पोलीस अधीक्षक प्रदीप गुप्ता यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. घटनास्थळाचा आढावा घेण्यात आला. या प्रकरणाचा तपास सुरू असून, लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times