हायलाइट्स:
- मुंबई हायकोर्टाने केलेल्या टिपण्णीनंतर एनसीबीला मोठा धक्का
- मलिक यांनीही पुन्हा केला हल्लाबोल
- समीर वानखेडे यांच्या निलंबनाची केंद्राकडे मागणी
‘आर्यन खान याचा ड्रग्ज प्रकरणाशी किंवा ड्रग्ज माफियांशी संबंध नाही म्हणजे हा फर्जीवाडा होता हे आता हायकोर्टाच्या निकालानंतर स्पष्ट झालं आहे,’ असा शब्दांत नवाब मलिक यांनी आपली भूमिका मांडली आहे.
‘आर्यन खानचं खंडणीसाठी अपहरण’
हायकोर्टाने आज आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या निकालानंतर नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे याच्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मी सुरुवातीपासूनच आर्यन खानचं अपहरण खंडणीसाठी करण्यात आलं होतं, हे सांगत होतो. आता हे या आदेशावरून स्पष्ट झालं आहे, असं मलिक यांनी म्हटलं आहे.
‘आता समीर दाऊद वानखेडे सुप्रीम कोर्टात धाव घेईल. रिया चक्रवर्ती प्रकरणातही एनडीपीएस कोर्टाने जामीन दिल्यावर हायकोर्टात धाव घेतली होती. हा सगळा जनतेचा पैसा आहे अशी उधळपट्टी थांबली पाहिजे,’ असंही नवाब मलिक म्हणाले.
केंद्र सरकारकडे कोणती मागणी केली?
दरम्यान, ‘समीर वानखेडे हा खोट्या केसेस करुन लोकांना अडकवत आहे. खंडणी वसूल करण्याचे धंदे करत आहे. आता वेळ आली आहे की केंद्र सरकारने भूमिका घेऊन या भ्रष्ट अधिकार्याचे तात्काळ निलंबन करावं आणि आताही पाठराखण झाली तर भाजपचा यामागे हात आहे, हे स्पष्ट होईल,’ असा टोलाही नवाब मलिक यांनी भाजपला लगावला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times