हायलाइट्स:
- आणखी एका टोळीचाही भांडाफोड
- लुटणाऱ्या टोळीस पोलिसांनी केली अटक
- आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलीचाही समावेश
याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापुरातील एका तरूण कापड व्यापाऱ्याची एका अल्पवयीन मुलीशी ओळख झाली. नंतर तिने त्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. विश्वास संपादन केला आणि एक दिवस ती त्याच्या फ्लॅटवर गेली. पाठोपाठ तिचे सहा साथीदार तेथे पोहोचले. ‘दहा लाख रूपये दे नाही तर तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करतो’ अशी धमकी त्यांनी दिली. घाबरलेल्या त्या युवकाने दीड लाख रूपये दिले. याशिवाय त्याच्याकडून तीन कोरे चेक घेतले. त्यावर सही घेतली आणि त्याला निर्जन ठिकाणी नेऊन मारहाण केली.
काही दिवसांनी पुन्हा त्याला एका फायनान्स कंपनीत नेले. तेथे त्याचे सोने गहाण ठेवून एक लाख रूपये घेतले. त्यानंतर वांरवार त्याला धमकी देत पैसे उकळत राहिले. या धमक्यांना घाबरत त्याने किटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण नातेवाईकांनी त्याला वाचवलं. या टोळीच्या सततच्या धमकीने शेवटी त्या तरूणाने पोलिसात फिर्याद दिली. स्थानिक गुन्हा अन्वेषन शाखेने सापळा लावला आणि पैसे देण्यासाठी त्यांनी तरूणीसह तिच्या साथीदारांना एका ठिकाणी बोलवण्यास सांगितलं. त्या तरूण व्यापाऱ्याने बोलवताच सर्वजण पैसे घेण्यासाठी आले आणि पोलिसांच्या जाळ्यात सापडले, ज्यामुळे हनी ट्रॅप टोळीचा भांडाफोड झाला.
दरम्यान, या टोळीचा म्होरक्या असलेला सागर माने हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. हनी ट्रॅपच्या माध्यमातून तरूणाला लुटल्याप्रकरणी त्याच्यासह अन्य पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये आकाश पाटील, अरबाज मुटंगी, सौरभ चांदणे, लुकमान सोलापुरे व उमेश साळुंखे यांच्यासह अल्पवयीन मुलीचाही समावेश आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times