हायलाइट्स:
- बिहारमध्ये पत्रकारांवरील हल्ले सुरूच
- मधुबनीनंतर अररिया येथे पत्रकारावर गोळीबार
- गंभीर जखमी अवस्थेत पत्रकाराला रुग्णालयात केले दाखल
- जमावाने आरोपीला पकडून भररस्त्यात दिला चोप
या घटनेनंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपी सुमन कुमार याला ग्रामस्थांनी पकडले आणि त्याला मारहाण केली. त्याच्याकडील पिस्तूल जप्त करण्यात आले. आजूबाजूच्या लोकांनीही सुमन कुमार याला मारहाण केली. रस्त्यावर त्याचा फरफटत नेले आणि त्याची धिंड काढली. या हल्ल्यामागे जुना वाद असल्याचे सांगण्यात येत आहे. राणीगंजच्या गीतवासजवळ ही घटना घडली असून, पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
या घटनेच्या बाबतीत स्थानिकांनी सांगितले की, राणीगंजच्या गीतवास येथे जुन्या वादातून वृत्तपत्रासाठी काम करणारे पत्रकार बलराम विश्वास यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या सुमन कुमार याने जीवघेणा हल्ला केला. त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. पिस्तुलातून झाडलेली गोळी त्यांच्या छातीच्या जवळ लागली. गोळीबाराचा आवाज ऐकून स्थानिकांनी धाव घेतली आणि आरोपी सुमनला पकडले. त्याला जमावाने बेदम मारहाण केली. यात तोही जखमी झाला आहे. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी सांगितले की, आतापर्यंत तपासातून मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यामागे जुना वाद आहे आणि आरोपी सुमन कुमार याला पकडण्यात आले आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. आरोपीला जमावाने मारहाण केल्याने तो जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यामागील सत्य समोर येईलच, त्यानंतरच अधिक माहिती देणे योग्य होईल, असेही पोलिसांनी सांगितले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times