हायलाइट्स:
- डीजेच्या दणदणाटामुळे पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या दगावल्याचा आरोप
- पोल्ट्री फार्म मालकाची शेजाऱ्याविरोधात केली तक्रार
- नीलागिरी पोलीस ठाण्यात केली तक्रार दाखल
- ओडिशातील बालासोरमधील प्रकार
ओडिशातील बालासोरमध्ये एका पोल्ट्री फार्म मालकानं आपल्या शेजाऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. लग्नाच्या वरातीत जोरजोरात डीजे वाजवला. तसंच आतषबाजीही केली. या आवाजाने पोल्ट्री फार्ममधील ६३ कोंबड्या दगावल्याचा आरोप त्याने केला आहे. नीलागिरी पोलीस ठाण्यात त्याने ही तक्रार दाखल केली आहे. कंडागराडी गावातील रहिवासी पोल्ट्री फार्मचा मालक रंजित परिदा यांनी हा दावा केला आहे. त्यांचा शेजारी रामचंद्र परिदा यांनी काढलेल्या वरातीत दणक्यात डीजे वाजवला. त्यामुळे पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या दगावल्या.
रंजित याने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास लग्नाची वरात त्याच्या पोल्ट्री फार्मजवळून गेली. या वरातीत डीजे वाजवला. यामुळे पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या सैरावैरा पळू लागल्या. त्याने अनेकदा डीजेचा आवाज कमी करण्याची विनंती केली. मात्र, असह्य डीजेचा आवाज घुमतच होता. त्यामुळे पोल्ट्री फार्ममधील ६३ कोंबड्या मृत्युमुखी पडल्या. रंजितचे म्हणणे आहे की, डीजेच्या आवाजाने कोंबड्या जोरजोरात फडफडू लागल्या. काही तर सैरावैरा पळत होत्या. थोड्या वेळाने सर्व कोंबड्या जमिनीवर निपचित पडल्या. त्यांनी स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून तपासणी करून घेतली. त्यावेळी जोराच्या आवाजाने कोंबड्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
अभियांत्रिकी पदवी प्राप्त रंजितला नोकरी मिळू शकली नाही. त्याने २०१९ मध्ये नीलागिरीमध्ये एका सहकारी बँकेकडून २ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्या पैशांतून त्याने स्वतःचे पोल्ट्री फार्म सुरू केले. सुरुवातीला रंजितने शेजारी राहणाऱ्या रामचंद्रकडून नुकसान भरपाई मागितली होती. मात्र, त्याने भरपाई देण्यास नकार दिला. शेवटी काहीच पर्याय नसल्याने रंजितने त्याच्याविरोधात नीलगिरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सांगितले की, याबाबत नीलगिरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारदाराने केलेल्या आरोपांमध्ये तथ्य आहे का, याचा तपास केला जात आहे. दुसरीकडे रामचंद्र याने सर्व आरोप फेटाळले आहेत. लाखो कोंबड्यांची वाहतूक केली जाते. रस्त्यावरून अनेक वाहने जोरजोरात हॉर्न वाजवतात. या आवाजाने कधी काही होत नाही. मग डीजेच्या आवाजाने कोंबड्या कशा मरू शकतात, असा सवाल त्याने केलाय. ज्यावेळी रंजितने डीजेचा आवाज कमी करण्यास सांगितला, त्यावेळी आम्ही त्याचे म्हणणे ऐकून घेतले. डीजेचा आवाज कमी केला, असे रामचंद्रचे म्हणणे आहे. दरम्यान, याबाबत तक्रार प्राप्त झाली असून, तपास केला जात आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times