हायलाइट्स:
- लष्करात अधिकारी असल्याची बतावणी करून लग्नाची वरात घेऊन मंडपात पोहोचला
- नवरदेव निघाला रोजंदारीवर काम करणारा मजूर
- वधू पक्षाकडील मंडळींनी केली नवरदेवाची धुलाई
- दोन वर्षांपूर्वी आरोपीने मुलीला पळवून नेऊन केले होते लग्न
कुंदरकी गावातील मुख्य बाजारपेठेत हा प्रकार घडला. काही महिन्यांपूर्वी समाजातील एका वैवाहिक पुस्तिकेत संदीप उपाध्याय याची सर्व माहिती होती. हाथरस जिल्ह्यातील असल्याचे त्यात नमूद करण्यात आले होते. त्यावर विश्वास ठेवून लग्नाची बोलणी करण्यात आली. वर पक्षाकडून नवरदेव हा भारतीय सैन्यात एसडीओ पदावर कार्यरत असल्याचे सांगण्यात आले.
तीन दिवसांपूर्वी लग्नात वर पक्षाला भेट म्हणून पलंग, रोकड, दागिने, महागडे कपडे असं सर्व काही दिले. सर्वांच्या संमतीने २२ नोव्हेंबरला वरात येणार होती. रात्री उशिरा ११ वाजता नवरदेव संदीप काही मोजक्या पाहुण्यांना घेऊन मंडपात पोहोचला. मात्र, कुंदरकी परिसरातील काही मंडळी नवरदेवाचे हावभाव आणि त्याचे वागणे बघून थोडे आश्चर्यचकित झाले. काही जणांनी नवरदेवाकडे त्याची वैयक्तिक माहिती विचारली. मात्र, त्याने थातुरमातुर उत्तरे दिली. त्यामुळे त्यांना संशय आला. नवरदेव हा मजूर असल्याची माहिती उघड झाली. अखेर वधू पक्षाला त्याने भेट म्हणून घेतलेले पैसे आणि इतर वस्तू परत केल्या. वधुपक्षाकडील मंडळींनी नवरदेवाला थांबवले. त्यानंतर मंडपात एकच गोंधळ उडाला. गोंधळ वाढल्यानंतर त्याच्यासोबत आलेले पाहुणे निघून गेले. तिथे नवरदेवाला मारहाण केली. त्यानंतर मंगळवारी सकाळी नवरदेवाला पोलिसांच्या ताब्यात दिले.
आरोपी संदीपची पोलिसांनी चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. वैवाहिक पुस्तिकेत असलेली सर्व माहिती खोटी आहे. तो लष्करात कोणत्याही पदावर कार्यरत नाही. तो सध्या आपल्या आईसोबत एका भाड्याच्या घरात साकेत कॉलनीत राहतो असे त्याने चौकशीत सांगितले. त्याच्या मोठ्या भावाने सांगितले की, संदीपचे लग्न दोन वर्षांपूर्वी कानपूरच्या एका मुलीसोबत झाले होते. संदीपने मुलीला पळवून नेऊन कोर्टात लग्न केले होते. मात्र, त्यानंतर ती संदीपला सोडून निघून गेली, असेही त्याने सांगितले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times