संभाजी राजे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हे पत्र ट्विट केलं आहे. यवनांच्या तावडीतून स्वराज्याचे रक्षण करण्याकरता असंख्य मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यात कान्होजी आंग्रे हे आघाडीवर होते. स्वराज्याच्या सागरी सीमांचं रक्षण करताना कान्होजींनी दिलेल्या योगदानाला तोड नाही. केवळ औरंगजेबाच्या काळातच नव्हे तर कान्होजींनी १७२९ सालापर्यंत मराठा साम्राज्याची अहर्निश सेवा करून इंग्रज, पोर्तुगीज आणि सिद्धी या शत्रूंवरही दहशत बसवली. त्यांच्या पराक्रमाचे शेकडो पुरावे इंग्रज व पोर्तुगीजांच्या दप्तरात जागोजागी सापडतात. हिंदुस्थानचा आरमारी इतिहास कान्होजी आंग्रे यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, असं संभाजी राजे यांनी पत्रात म्हटलं आहे.
‘दिल्लीतील नॉर्थ ब्लॉकमधील नौदल प्रमुखांच्या कार्यालयाच्या अगदी दारात कान्होजींचं स्मारक आहे. आपल्या नौदल प्रमुखांनी आद्य नौदल प्रमुखांना सॅल्यूट करूनच कार्यालयात जावे, अशी कदाचित त्यामागची संकल्पना असेल. कोकणच्या भूमीत जन्मलेल्या या महान सुपुत्राची दखल साऱ्या जगाने घेणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातील आणि देशातील तमाम शिवभक्तांच्या तसेच इतिहास प्रेमींच्या मनातली ही मागणी असून, राज्य सरकार आणि केंद्र सरकार आमची मागणी पूर्ण करेल, असा विश्वासही संभाजीराजेंनी व्यक्त केला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times