हायलाइट्स:
- जिल्हा बँक निवडणूक निकालावरून आरोप-प्रत्यारोप
- गिरीश महाजनांनी केला अजित पवारांवर हल्लाबोल
- गाफील ठेवल्याचा केला आरोप
‘एकत्र निवडणूक लढवण्याचं सांगत आम्हाला गाफील ठेवलं आणि महाविकास आघाडीतील तीन पक्षांनी ऐनवेळी आम्हाला बाजूला करत निवडणूक लढवण्याची भूमिका घेतल्यामुळेच भाजपला पराभव स्वीकारावा लागला,’ अशी खंत भाजप नेते गिरीश महाजन यांनी व्यक्त केली. तसंच अजित पवारांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वेळेवर आमचा गेम केला, असंही महाजन म्हणाले. औरंगाबाद येथील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पुढे बोलताना महाजन म्हणाले की, ‘निवडणुकीपूर्वी आमच्या सर्वांच्या तीन बैठका झाल्या आणि बिनविरोध निवडणूक लढवू असं ठरलं. त्यानंतर कुणी किती जागा लढवायच्या हे देखील ठरलं आणि आमच्या वाट्याला ७ जागा आल्या. त्यानंतर सर्वांनी ७-७ फॉर्म भरायचं असं निश्चित झालं. पण फॉर्म भरण्याच्या एक दिवस आधी युती करायची नसल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सांगण्यात आलं. त्यानंतर मी अजित पवारांना बोललो तेव्हा खालचे लोकं ऐकत नसल्याचं ते म्हणाले. त्यामुळे आम्ही गाफील राहिलो आणि पराभव स्वीकारावा लागला,’ असं महाजन यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीला एकहाती विजय मिळाला. एकूण २१ जागांपैकी ११ जागा राष्ट्रवादी काँग्रेस, ७ जागांवर शिवसेना आणि २ जागांवर काँग्रेसला विजय मिळवता आला, तर भाजपला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times