हायलाइट्स:
- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना दिलासा
- परमबीर सिंह चांदिवाल आयोगासमोर हजर
- परमबीर सिंह यांच्याविरोधातील जामीनपात्र अटक वॉरंट रद्द
- गैरहजर राहिल्याबद्दल परमबीर सिंह यांना सुनावला १५ हजारांचा दंड
‘आजारपणामुळे यापूर्वी झालेल्या सुनावणीला आयोगासमोर हजर राहता आले नाही’, असे कारण देत परमबीर यांनी आयोगासमोर स्पष्टीकरण दिले. तसेच जामीनपात्र अटक वॉरंट रद्द करण्याची विनंती अर्जाद्वारे केली. त्यानंतर न्या. चांदिवाल यांनी वॉरंट रद्द करणारा आदेश काढला, मात्र परमबीर यांना १५ हजार रुपयांचा दंडही सुनावला.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आज, सोमवारी चांदिवाल चौकशी आयोगासमोर हजर झाले. आयोगाने त्यांच्याविरोधातील जामीनपात्र अटक वॉरंट रद्द करून त्यांना दिलासा दिला. मात्र, गैरहजर राहिल्याबद्दल त्यांना १५ हजार रुपयांचा दंड सुनावला. ही रक्कम आठवडाभरात मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याची हमी परमबीर यांच्याकडून आयोगासमोर देण्यात आली. सध्या आयोगासमोर बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची चौकशी सुरू आहे. परमबीर हे चौकशीसाठी हजर राहणार का, अशी विचारणा यावेळी न्यायमूर्ती के. यू. चांदिवाल यांनी केली. त्यावेळी त्यांच्याविरोधात अनेक प्रकरणे सध्या सुरू असल्याने तूर्तास चौकशीला गैरहजर राहण्याची मुभा देण्यात यावी, अशी विनंती सिंह यांच्या वकिलांनी केली.
त्यावर याबाबत प्रतिज्ञापत्रावर तपशीलवार माहिती आयोगासमोर देण्यात यावी, त्यानंतर गैरहजर राहण्याबाबतची मुभा देण्याच्या अर्जावर आदेश देऊ, असे संकेत न्यायमूर्ती चांदिवाल यांनी दिले.
मुंबईच्या चिंतेत भर; दक्षिण आफ्रिकेतून आलेला डोंबिवलीकर करोना पॉझिटिव्ह
परमबीर यांनी अनिल देशमुख यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने त्याची सत्यता तपासण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्ती के. यू. चांदिवाल चौकशी आयोग नेमला. सुनावणीसाठी हजर राहण्याकरिता समन्स बजावूनही हजर न राहिल्याने आयोगाने यापूर्वी दोन वेळा २५ हजार रुपयांचा दंड सुनावला. तरीही हजर न झाल्याने जामीनपात्र अटक वॉरंट बजावले होते. मात्र, परमबीर यांचा काहीच थांगपत्ता न लागल्याने पोलिसांना ते वॉरंट बजावता आले नाही. दरम्यानच्या काळात ‘मला जे म्हणायचे होते, ते मी मुख्यमंत्र्यांना २० मार्च रोजी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, मला आणखी काही म्हणायचे नाही’, असे प्रतिज्ञापत्र परमबीर यांनी आयोगात दिले. काही दिवसांपूर्वी परमबीर हे पुन्हा प्रतिज्ञापत्र दाखल करतील आणि पुन्हा तेच म्हणतील, असे त्यांच्या वकिलांनी आयोगाला सांगितले. त्यानंतर परमबीर मुंबईत आल्याने त्यांना आयोगासमोर हजर व्हायला सांगा, अन्यथा वॉरंटची अंमलबजावणी करण्याचे निर्देश पोलिसांना द्यावे लागतील, असा इशारा आयोगाने त्यांच्या वकिलांना दिला होता. त्यामुळे परमबीर आज आयोगासमोर हजर झाले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times