हायलाइट्स:
- ओमिक्रॉनवर राज्य मंत्रिमंडळात चर्चा
- मंत्रिमंडळाने व्यक्त केली चिंता
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडली स्पष्ट भूमिका
- पंतप्रधानांना यासंदर्भात अवगत करण्यावर बैठकीत चर्चा
करोनाच्या ‘ओमिक्रॉन’ विषाणूसंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. यावेळी या विषाणूच्या संसर्गाला रोखण्यावर चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची माहिती नियमित मिळत राहावी, जेणेकरून त्यांच्यावर लक्ष ठेवता येईल आणि या विषाणूच्या संसर्गाला वेळीच रोखण्यात यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ज्या देशांमध्ये पुन्हा एकदा करोनाचा उद्रेक झाला आहे, तेथील लाट सर्वात मोठी असून फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड, ऑस्ट्रिया या देशांमध्ये दर दिवशी ३० हजारांपेक्षा जास्त लोक करोनाग्रस्त झालेले आढळून आले आहे. ओमिक्रॉन विषाणूचे ५० पेक्षा जास्त म्युटेशन्स आहेत. सध्याच्या आरटीपीसीआर चाचणीत या व्हेरियंटची लागण असल्यास एस जिन आढळणार नाही. सध्या तरी प्रतिबंधासाठी मास्क सर्वात जास्त आवश्यक आहे. केंद्र सरकारने १२ देशांतील प्रवाशांची तेथून विमानात बसण्यापूर्वी ७२ तास अगोदर आरटीपीसीआर चाचणी आवश्यक केली असून, येथे उतरल्यावर परत एकदा आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. तसेच सात दिवसांसाठी विलगीकरण आवश्यक करण्यात आले आहे.
परदेशातून येणारे प्रवासी थेट मुंबईत किंवा महाराष्ट्रातील इतर विमानतळांवर न उतरता देशात इतरत्र उतरून नंतर देशांतर्गत विमानसेवेने किंवा रस्ते आणि रेल्वेमार्गे आल्यास त्यांची तपासणी कशी करणार हा सध्याचा प्रश्न असून, पंतप्रधानांना देखील यासंदर्भात अवगत करण्यात यावे, यावर बैठकीत चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशभरातील आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत विमानसेवांनी प्रवाशांची माहिती नियमितपणे एकमेकांना दिल्यास रुग्ण प्रवासी तसेच त्यांच्या संपर्कातील प्रवासी शोधणे सोपे जाईल, असे सांगितले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times