हायलाइट्स:
- रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले
- जिल्ह्यातील आंबा बागायतदार हवालदिल
- वातावरणातील बदलामुळे आंब्याला आलेले मोहोर गळण्यास सुरुवात
- अवकाळी पावसामुळे आलेले संकट दूर होऊ दे, कोकणवासीयांची प्रार्थना
कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवारपासून पावसाने हजेरी लावली. काल, बुधवारी दुपारनंतर जिल्ह्यात सगळीकडे पावसाने जोरदार हजेरी लावली. गुरुवारी सकाळनंतर पावसाने काहिशी विश्रांती घेतली. मात्र, अवकाळी पावसाने आंबा बागायतदारांचे नुकसान केले आहे.
ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरू झाला होता. आधी निसर्ग वादळ, तौक्ते वादळ, काही ठिकाणी महापूर आणि आता अवेळी पावसाने कोकणवासीयांना मेटाकुटीला आणले आहे. वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी, बागायतदार आणि नागरिक अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. रत्नागिरी परिसरात एक घरावर झाड कोसळून नुकसान झाले.
या अवेळी पावसामुळे आंबा बागायतदार हवालदिल झाला आहे. दिवाळीत कोकणातील घरांसमोर केलेली अंगण (खळी) पुन्हा उखडले आहेत. थंडी व दिवसा स्वच्छ सूर्यप्रकाश असल्यास आंबा मोहोरतो व आंब्यासाठी पोषक वातावरण आवश्यक असते. मात्र अवेळी सुरू झालेला पाऊस, सतत असणारे ढगाळ वातावरण हे आंब्यासाठी पोषक नाहीच. त्यामुळे हे हवामान बदलाचे संकट लवकर टळू दे, अशी प्रार्थना कोकणवासीय करत आहेत. या पावसामुळे वातावरणात कमालीचा गारवा पसरला होता. ज्या ठिकाणी मोहोर आला होता, तो गळून पडण्यास सुरुवात झाली आहे. मात्र ज्या ठिकाणी कणीदार फळधारणा झाली आहे, त्या ठिकाणी बुरशीनाशक फवारणी करून प्रयत्न करावे लागतील. असंही यंदा अवेळी पावसाने आंबा बागायतदार अडचणीत आला आहे, अशी माहिती बागायतदार बाळ यांनी दिली.