हायलाइट्स:
- काँग्रेस सक्षम विरोधी पक्षाची भूमिका पार पाडत आहे; नाना पटोले
- भाजपला थेट आव्हान देणारे राहुल गांधी देशातील एकमेव नेते
- नाना पटोलेंनी साधला अप्रत्यक्ष निशाणा
- भाजपच्या सत्ताकाळात देश, लोकशाही आणि संविधान धोक्यात: पटोले
पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या सत्ताकाळात देश, लोकशाही व संविधान धोक्यात आले आहे. सीबीआय, ईडी, आयकरसारख्या सर्व सरकारी यंत्रणांची भीती विरोधी पक्षांना दाखवली जात आहे. परंतु काँग्रेस अशा कोणत्याच दडपशाहीला भीक घालत नाही. राहुल गांधी, प्रियांका गांधी या सातत्याने केंद्र सरकारकडून होणाऱ्या अत्याचाराविरोधात आक्रमपणे लढा देत आहेत. शेतकरी, कामगार, मागास, पीडित समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. काही राजकीय पक्ष ईडी, सीबीआयच्या कारवाईच्या भीतीने भाजपविरोधात बोटचेपी भूमिका घेत आहेत. काँग्रेस पक्ष मात्र रस्त्यावर उतरून केंद्र सरकार विरोधात लढत आहे. अहंकारी सत्तेलाही सामान्य जनतेच्या शक्तीसमोर हार मानावी लागते हे शेतकरी आंदोलनाने दाखवून दिले आहे. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे तीन कृषी कायदे १२ मिनिटांत रद्द करावे लागले, असेही पटोले म्हणाले.
महागाई, शेतकरी, कामगारांचे व जनतेच्या प्रश्नावर काँग्रेसचा संघर्ष सुरू आहे व यापुढेही तो सुरुच राहील. जनतेचा काँग्रेस पक्षावर विश्वास आहे व हा विश्वास दिवसेंदिवस आणखी वाढत आहे. काँग्रेस पक्षाला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही, असे पटोले म्हणाले. काँग्रेस पक्ष भाजप विरोधात ठाम उभा आहे. तसेच इतर पक्षही कोणाबरोबर आहेत हे देशातील जनतेला माहिती झाले पाहिजे. काँग्रेसला वगळून अनेक आघाड्या करण्याचे प्रयत्न केले गेले, त्याचा फायदा कोणाला होतो हेही कळले असून, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष यापुढेही भाजपला तोंड देण्यास समर्थ आहे, असेही ते म्हणाले.