हायलाइट्स:
- देशात ओमिक्रॉनच्या एण्ट्रीने महाराष्ट्र सावध
- जिल्ह्यात प्रशासन अधिक सतर्क
- तपासणीसाठी आठ ठिकाणी नाके उभारले
करोनाचा नवा घातक व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनची भीती पसरल्याने जिल्ह्यात प्रशासन अधिक सतर्क झालं आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी नागरिकांना अधिक काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. अजूनही तीन लाखांहून अधिक लोकांनी करोना लशीचा एकही डोस घेतलेली नाही. त्यामुळे या सर्वांना डोस देण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. गेले दोन महिने लस घेण्यासाठी निरूत्साह दिसत होता. आता मात्र प्रत्येकाला दोन डोसची सक्ती केल्याने दोन दिवसापासून डोस घेण्यासाठी गर्दी होत आहे.
गुरुवारी दिवसभरात शहरात सात हजार लोकांना करोना लशीचा डोस देण्यात आले.
शेजारच्या कर्नाटकात गुरुवारी ओमिक्रॉनचे दोन रूग्ण आढळल्याने जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाला दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आलं आहे. त्याच्या तपासणीसाठी कोगनोळी टोल नाका, आंबोली, आंबा यासह अनेक ठिकाणी नाके उभारण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर सहा पोलीसही तैनात करण्यात आले आहेत.