हायलाइट्स:
- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
- काही वर्षापासून संविधानातील मूलतत्वांना तिलांजली दिली जात आहे: पटोले
- ‘बाबासाहेबांनी दिलेला सर्वधर्मसमभावाचा विचारच या देशासाठी हिताचा’
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महामानवाला अभिवादन केले. त्यानिमित्त पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. पटोले म्हणाले की, ”डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याची व्यवस्था केली. त्यांच्यामुळेच सर्वसामान्य समाज घटकातील लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळाली.” संविधानाने सर्व समाज घटकांना समान न्यायाचा मार्ग दाखवला. हजारो वर्षे अन्याय, अत्याचार सहन करावा लागणाऱ्या वंचित, मागास घटकाला बाबासाहेबांनी ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’, हा मंत्र देऊन जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशात नवी ओळख देण्याचे क्रांतीकारी कार्य केले आहे, असेही पटोले म्हणाले. बाबासाहेबांनी दिलेला सर्वधर्मसमभावाचा विचारच या देशासाठी हिताचा आहे. त्यांनी घालून दिलेल्या मार्गानेच वाटचाल करूयात आणि संविधान वाचवूया, असे आवाहन पटोले यांनी केले.
टिळक भवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
महापरिनिर्वाण दिनी प्रदेश काँग्रेसचे मुख्य कार्यालय टिळक भवन येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्ती अंबिरे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजेश शर्मा व इतर पदाधिकारी उपस्थित होते.