मुंबई: ‘कोरोना व्हायरसच्या विरोधातील लढाई आपण जिंकणारच आहोत परंतु गरज आहे संयम, समंजसपणा आणि योग्य त्या दक्षता घेण्याची. मला विश्वास आहे आपण हे सगळं गांभीर्याने घ्याल,’ असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी केलं आहे.

आपल्या ट्विटर अकाउंटवरून त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात राज्यातील व देशातील परिस्थितीवर भाष्य केलं आहे. ‘कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य व केंद्र सरकारनं काही निर्णय घेतले आहेत. त्या निर्णयांची गांभीर्याने नोंद घेऊन कृती करण्याची आवश्यकता आहे. सरकारनं नागरी भागांमध्ये जमावबंदीचा निर्णय घेतला आहे. परंतु अजूनही अनेक शहरांत व काही ठिकाणी लोकांचे घोळके बघायला मिळतात,’ अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.

‘अन्य देशांतील नागरिकांनी तेथील परिस्थितीचा अंदाज घेऊन आवश्यक ती दक्षता घेतली आहे. आपणही तेच करायला हवं. महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळं अतिशय अपरिहार्य कारण असेल तरच घराबाहेर पडण्याचा विचार करावा. पोलीस व सरकारी यंत्रणेला पूर्ण सहकार्य करावं,’ असं पवार यांनी व्हिडिओ संदेशात म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आज ट्विट करून लोक लॉकडाउनला गांभीर्यानं घेत नसल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यानंतर शरद पवारांनी जनतेला हे आवाहन केलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील करोना रुग्णांचा आकडा आज १५ ने वाढला आहे. त्यामुळं चिंता वाढली आहे. गर्दी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here