‘करोना’चं संकट दिवसेंदिवस वाढत असून बाधित रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्यामुळं महाराष्ट्र सरकारनं संपूर्ण राज्यात जमावबंदी आदेश लागू केला आहे. तसंच, सर्वसामान्यांसाठी सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. एकप्रकारे महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. देशातील अनेक राज्यांतही काहीशी अशीच परिस्थिती आहे. मात्र, सरकारच्या आदेशानंतरही लोक बिनधास्त रस्त्यावर येत आहेत. खासगी वाहने बाहेर दिसत आहेत.
या परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून चिंता व्यक्त केली होती. ‘लॉकडाउनला लोक गांभीर्यानं घेताना दिसत नाहीत. कृपा करून स्वत:ला व आपल्या कुटुंबाला वाचवा. सूचनांचं गांभीर्यानं पालन करा,’ असं आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी केलं होतं. पंतप्रधानांच्या या ट्विटला संजय राऊत यांनी तात्काळ उत्तर दिलं आहे. ‘मोदीजी, आपण स्वत:च या चिंताजनक परिस्थितीला उत्सवाचं स्वरूप दिलंत. मग दुसरं काय होणार,’ असं राऊत यांनी म्हटलं आहे.
‘करोना’च्या पार्श्वभूमीवर रविवारी पंतप्रधान मोदी यांनी जनता कर्फ्यूची घोषणा केली होती. कर्फ्यूच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता सर्व लोकांनी आपापल्या घराच्या बाल्कनीत येऊन अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता म्हणून टाळ्या, थाळ्या व घंटी वाजवण्याचं आवाहन केलं होतं. लोकांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसादही दिला होता. ते करताना अनेकांनी गर्दी करून मूळ उद्देशाला हरताळ फासला. तोच धागा पकडून संजय राऊत यांनी मोदींना टोला हाणला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times